मुक्त पत्रकार डॉ. जनार्दन भोसले यांना प्रतिष्ठेचा ‘स्वाभिमान लेखणी पुरस्कार’ जाहीर
![]()
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा राज्यस्तरीय सन्मान
वाई, प्रतिनिधी : चित्रपट, नाट्य अभिनेते, दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर भिकाजी टेतांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय ‘पत्रकार, मुक्तपत्रकार, संपादक, कला, साहित्य व समाजसेवक पुरस्कार सोहळा २०२६’ ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या सोहळ्यातील प्रतिष्ठेचा ‘स्वाभिमान लेखणी पुरस्कार’ बावधन (ता. वाई) येथील दैनिक तरुण भारतचे माजी पत्रकार तथा पुणे येथील मुक्त पत्रकार डॉ. जनार्दन भोसले यांना जाहीर झाला आहे.
डॉ. भोसले यांनी दैनिक तरुण भारतच्या बावधन वार्ताहर म्हणून कार्यरत असताना वृत्तसंकलनाबरोबरच वितरण, जाहिरात आणि वृत्त विभागातही उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत तत्कालीन संपादक किरण ठाकूर यांनी त्यांचा विशेष सत्कार केला होता.
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणातील विविध घडामोडी सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वृत्तरूप देत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी पत्रकारितेतून केला. तसेच साप्ताहिक कृष्णातीर, पोवई नाका आणि सह्याद्रीचा एल्गार या माध्यमांमधूनही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
सन २००५ पासून पुणे येथे मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. जनार्दन भोसले यांच्या दीर्घ, निष्ठावान आणि समाजाभिमुख पत्रकारितेची दखल घेत त्यांना ‘स्वाभिमान लेखणी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असून, त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार, साहित्य, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.





















