Sat, Sep 5, 2026
सातारा जिल्हा

जलसंधारण सप्ताह व अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करा – याशनी नागराजन

जलसंधारण सप्ताह व अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करा – याशनी नागराजन
Ashok Ithape
  • PublishedAugust 20, 2026

सातारा दि. 19 :- मृद व जलसंधारण हे शेती, पर्यावरण आणि शाश्वत विकासाचा पाया मानले जाते. माती व पाण्याचे संरक्षण करणे आणि भावी पिढीमध्ये याविषयी जागरुकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. ही बाब विचारात घेऊन जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या जलसंधारण अभियानामध्ये युवा पिढीचा सहभाग वाढवून क्षेत्रीय स्तरावर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.

जिल्ह्यात १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत व्यापक ‘जलसंधारण अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये जलसंधारणाचे महत्व पटवून देणाऱ्या निबंध स्पर्धा, चित्रकला-पोस्टर स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आणि ‘एक शाळा, एक शोषखड्डा हे उपक्रम राबवले रबवावे.. तसेच २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त सर्व शाळा व शासकीय कार्यालयांमध्ये जलसंधारणाची शपथ घेणे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचे नियोजन करण्यात यावे.

या मोहिमेत केवळ शैक्षणिक संस्थाच नव्हे, तर प्रत्यक्ष धोरणात्मक व क्षेत्रीय कामांवरही भर दिला जावा. ग्रामीण भागात जलसंधारण कामांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि जलपूजन केले जावे. यासोबतच एक पेड माँ के नाम अभियानांतर्गत व्यापक वृक्षारोपण करणे, नाला व तलाव स्वच्छता मोहीम राबवणे आणि शेततळे, पाझर तलाव व बंधारे यांची पाहणी करून अद्ययावत माहिती संकलित करणे अशा कामांना गती द्यावी
शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देणे आवश्यक असून, जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!