Tue, Jul 21, 2026
सातारा जिल्हा

पालखी सोहळा उत्कृष्ट व नियोजनबध्द पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी संतोष पाटील

पालखी सोहळा उत्कृष्ट व नियोजनबध्द पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी संतोष पाटील
Ashok Ithape
  • PublishedJuly 10, 2026

सातारा दि.10- श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढवारी पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून दि.15 ते 19 जुलै कालावधीत मार्गस्थ होणार आहे.  हा पालखीसोहळा वारकऱ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी, खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छता, वीज पुरवठा, शौचालये व सुरक्षा यासारख्या पायाभूत दर्जेदार सूविधा देऊन भक्तीमय, सुरक्षित व आनंददायी वातावरणात पार पाडावा. यासाठी महसूल, पोलीस, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, आरोग्य आदी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, दुरदृश्यप्रणालीद्वारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे  यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, पालखी रथ वेळेवर मार्गस्थ होण्यासाठी गर्दी व पार्कींगचे नियोजन पोलीस विभागाने चांगल्या प्रकारे केले आहे. राव रामोशी पुलावरील बॅरिकेंटीग दुरुस्त करावे. निरा नदी ते लोणंद मार्गावरील दुकाने एका बाजूने उभी करण्यासाठी नियोजन करावे.  पावसामुळे खराब रस्त्यांची संबंधित यंत्रणेने तात्काळ दुरुस्ती करावी. संपूर्ण पालखी मार्गावर विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत त्यामुळे  वाहतूकीच्यादृष्टीने दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात.  लोणंदला कोकण व कोल्हापूरकडून येणाऱ्या वाहनांची गर्दी होते या वाहनांना व्यवस्थित मार्ग मिळेल याची दक्षता घ्यावी.    महावितरणने पालखी तळांवरील व मार्गावरील विद्यूत व्यवस्था अंखडीत ठेवून तारा तूटून दुर्घटना होऊ नये याची दक्षता  घ्यावी.

पालखी काळातील मुक्कामांच्या ठिकाणांची आठवडाभर स्वच्छता मोहिम राबवावी.  निरास्नानासाठी दत्त घाटाची स्वच्छता करुन घ्यावी. लोणंद, तरडगाव ते फलटण, बरड या मुख्य पालखी मार्गावरील रस्त्याची अपुरी कामे गतीने पूर्ण होण्यासाठी प्रातांधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण यांनी संयुक्तपणे भेटी देऊन पाहणी करावी.  रस्त्याकडेला असणाऱ्या विहीरींना सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरेकेटींग करावे. वारकऱ्यांना टँकर्सद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नगरपालिका, जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध करून देण्यात यावा. पाणी टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. वारी काळात वारकऱ्यांना मूलभूत व आरोग्य सुविधा मिळण्यावर भर देण्यात यावा.  याकाळात एखाद्या वारकऱ्याला  आरोग्यविषयक गंभीर समस्या उद्भवल्यास तात्काळ उपचारांसाठी हॉस्पिटलची निश्चिती करून ठेवावी. आरोग्य विभागाने फिरते दवाखाने, पुरेशा रुग्णवाहिका आणि औषधसाठा सज्ज ठेवावा. पालखीच्या संपूर्ण मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात  शौचालये उपलब्ध ठेवावीत. पालखी सोहळ्याचे दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन विभागा बसेसच्या 1400 फेऱ्या  होणार आहेत. यासाठी पुरविण्यात येणाऱ्या बसेस स्वच्छ व सुस्थितीत असल्या पाहिजेत. भारत संचार निगमने वारीकाळात अखंडीत कनेक्टीव्हिटी द्यावी. अन्न व औषध विभागाने व्यावसायिकांकडून पुरविण्यात येणाऱ्या खाद्य पदार्थांचा दर्जा तपासावा, या बाबतीत दक्ष राहून काम करावे.

पोलीस, महसूल, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी  16 वारी प्रमुखांशी सतत संपर्कात राहून भक्तीमय, आनंदी व सुरक्षित वातावरणात पालखीसोहळा सातारा‍ जिल्हृयातून मार्गस्थ करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!