महाराजांनी दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती राबवली हे दुर्ग म्हणजे छत्रपतींच्या विचारांचे कार्यांचे साक्षात मूर्त स्वरूप आहे : श्री. देवदत्त गोखले
वाई ता.४ शिवाजी महाराजांनी बांधलेले, जिंकलेले, जतन केलेले, गड किल्ले आजही भक्कमपणे उभे राहून महाराजांच्या दूरदृष्टीची कल्पकतेची व्यवस्थापनाची आणि कार्यक्षमतेची ग्वाही देतात. महाराजांनी दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती राबवली हे दुर्ग म्हणजे छत्रपतींच्या विचारांचे कार्यांचे साक्षात मूर्त स्वरूप आहे. असे भाष्य श्री. देवदत्त गोखले यांनी लोकमान्य टिळक स्मारक संस्था संचलित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेचे तृतीय पुष्पात व्यक्त केले. यावेळी श्री. आनंद पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
दुर्ग संस्कृती ते कार्य संस्कृती या विषयाचा आढावा घेताना देवदत्त गोखले म्हणाले महाराजांनी दुर्ग संस्कृतीतून कार्यसंस्कृतीचा पाया रचला या दुर्गांवर तेव्हाच्या काळात करण्यात आलेले व्यवस्थापन आज आर्किटेक्चरिंग आणि टेक कंपनीसाठी सुद्धा आदर्श आहे. तेव्हा छत्रपतींनी केलेले जल व्यवस्थापन, स्त्रोतांचे जतन, मानवी संसाधन नीतीचा वापर आजही उपयुक्त आहे. शिवरायांचा प्रत्येक दुर्ग मूल्यांचे प्रतिनिधित्व करतो शिवनेरी हा महाराष्ट्राचा संस्काराचे उगमस्थान आहे.
सिंधुदुर्ग या स्वराज्यातील पहिला जलदुर्ग बधकामात महाराजांची शाश्वत दृष्टी दिसते. 2004 च्या सुनामीने कोकण व मुंबई किनारपट्टी उध्वस्त झाली. मात्र शिवरायांच्या या मावळ्यांच्या तटबंदीला साधा तडाही गेला नाही. तोरणा म्हणजे कल्पकतेची सत्यात रूपांतर अर्थात स्वराज्य कल्पनेच्या पूर्तेतेसाठी पाहिले पाऊल राजगडाच्या बांधकामात २लाख ५०हजार टन दगड शिवाजी महाराजांनी दीड हजार मीटर उंचीवर चढवला यातुन प्रतित होते ती स्वराज्याच्या स्थिरतेसाठी सर्वोत्कृष्ट करण्याची वृत्ती गोखले यांनी आपल्या व्याख्यानात पुढे पुरंदर, रायगड, सिंहगड, सज्जनगड, पन्हाळा, प्रतापगड यांच्या प्रतीकात्मिकतेचा व बांधकाम शैलीचा विस्तृत आढावा घेतला आनंद पटवर्धन यांनी अध्यक्ष मनोगताद्वारे त्यात भर टाकली. श्री सुनील शिंदे यांनी प्रास्तावित केले तसेच गिरीश जाधव यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ सौ अंजली पतंगे यांनी आभार मानले.
हे व्याख्यान आईन्स्टाईन अकॅडमी पाचगणी व श्री.सुनील गुलाबराव शिंदे यांनी प्रायोजित केले होते. व्याख्यानासाठी वाईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.













