येत्या जून मध्ये तुमच्या नितीन काकांना राज्यसभेवर खासदार केले नाही तर पवारांची अवलाद सांगणार नाही : वाईतील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वक्तव्य
वाई, दि. ४ : महायुतीचे उमेदवार श्री.छ. उदयनराजे भोसले यांना वाई, खंडाळा, महाबळेश्वरमधून लाखाच मताधिक्य द्या. येत्या जून मध्ये तुमच्या नितीन काकांना राज्यसभेवर खासदार केले नाही तर पवारांची अवलाद सांगणार नाही. तिन्ही तालुक्याच्या सर्वांगिण विकासाची जबाबदारी माझ्यावर सोडा. निधीची कमतरता मकरंद पाटील यांना जाणवू देणार नाही. कारखान्यांनाही निश्चित अडचणीतून बाहेर काढू फक्त तुम्ही यावेळी उदयनराजे भोसले यांना मताधिक्याने निवडून द्या, असे उदगार राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी वाईतील सभेत काढले.
महायुतीचे सातारा लोकसभा मतदार संघांचे उमेदवार खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांची प्रचार सभा महात्मा फुले भाजी मंडई येथे संपन्न झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
यावेळी आ. मकरंद पाटील, आ. देवयानी फरांदे (नासिक ) जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, प्रतापराव पवार, धैर्यशील कदम,बकाजीराव पाटील,नितीन भरगुडे पाटील, आरपीआयचे अशोक गायकवाड, राजेंद्र राजपुरे, दत्तनांना ढमाळ, अमित कदम, प्रमोद शिंदे, शशिकांत पिसाळ, संजूबाबा गायकवाड, उदय कबूले, विजय नायकवडी मदन भोसले,आदी मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले, मी जो राजकीय निर्णय घेतलेला आहे तो चव्हाणसाहेबांनी घालून दिलेल्या पठडीला धरून आहे. चव्हाण साहेबांच्यावर पण काही राजकीय संकट आली चढउतार आले त्याचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहेत. परंतु त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय, बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने मदत करायची असेल तर तुम्हाला सरकारमध्ये जाऊनच ती मदत करावी लागते. मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.
युक्रेन मध्ये युद्धात अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी युद्ध थांबवायला लावून सुटका केली. हे येड्यागबाळ्याचे काम नाही. त्याला नेता खमक्या असावा लागतो. म्हणूच मी हा निर्णय घेतला. राजीव गांधी, मनमोहन सिंग यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप झाले. मात्र मोदींवर दहा वर्षात एकही आरोप झाला नाही. पुलवामा नंतर पाकिस्तानला असा दणका दिला की तो गपगार पडला आहे. या गोष्टी मान्यच करायला हव्यात. आगामी काळात साखर कारखानेही निश्चित अडचणीतून बाहेर काढू. पर्यटन, रस्ते, पेयजल योजना, शेती पाण्याच्या योजना अशा अनेक विकास कामांसाठी मी नेहमीच मकरंद पाटील यांच्या पाठीशी उभा आहे. या विकास कामाना आता केंद्राची जोड द्यायला हवी. त्यासाठी उदयनराजे भोसले यांना निवडून द्या.
उदयनराजे भोसले म्हणाले, वाशीच्या बाजार समितीमध्ये ज्यांनी चार हजार कोटींचा घोटाळा केला त्यांना तुम्ही निवडून देणार का. त्यांना खासदार केले तर तुमच्या खिशात दमडी तरी ठेवतील का. जर तुम्ही काही केले नाही तर मग घाबरता कशाला. अटकपूर्व जामीन तुम्ही का मिळवला असा सवाल करीत ते म्हणाले, या मतदारसंघात स्ट्रॉबेरी हळद आले यांचे मोठे उत्पन्न घेतले जाते. आगामी काळात याचे संशोधन केंद्र येथे उभारणार, पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग आणून तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात येईल. तीर्थक्षेत्रांचा विकास करणे. नगरपालिकांना विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे. शिरूर पोलादपूर हायवे, धोम ते प्रतापगड रोपवे आधी कामे प्राधान्य क्रमाने आगामी काळात करणार असल्याचे ते म्हणाले.
आ. मकरंद पाटील म्हणाले, विचारांनी एकत्र बांधलेले हे कार्यकर्ते आहेत. मी नाराज असल्याचा चुकीचा मेसेज समाजात गेला आहे. तसे काही नसून एक दिलाने सर्वांनी झाडून महायुतीचे काम करायचे आहे. तुमच्या आग्रहाखातर लिक्विडेशनमध्ये गेलेले दोन कारखाने आपण उरावर घेतले. त्यांना वाचवण्यासाठीच आणि ८५००० सभासदांचे संसार वाचवण्यासाठी. आपणाला महायुतीच्या सोबत जाणे गरजेचे आहे. संस्था वाचवायचे असतील तर उदयनराजेंना निवडून द्या. निवडणुकीत काही वेडेवाकडे झाले तर वरिष्ठ मला जाब विचारतील याचे भान ठेवा. याच महायुतीच्या सरकारने हजारो कोटींची गावागावांमध्ये कामे केली आहेत. कित्येक कामे प्रगतीपथावर आहेत, तर काहींच्या मंजुऱ्या मिळाल्या आहेत. हा विकासरत्न असाच अविरत चालू ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मताधिक्याने निवडून द्यावे.
यावेळी अशोकराव गायकवाड, नितीन भरगुडे पाटील, संजूबाबा गायकवाड, रोहित वाडकर, राजेंद्र लवंगरे यांची भाषणे झाली.
विठठल माने यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. नितीन सावंत यांनी आभार मानले.
कार्यक्रमास सत्यजित वीर, महादेव मस्कर, अनिल सावंत, बाळासाहेब चिरगुटे, प्रदीप चोरगे, राजेश गुरव , संजय लोळे, दीपक ओसवाल, विक्रांत डोंगरे , शशिकांत पवार, आदींसह वाई, खंडाळा, महाबळेश्वर येथील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.





















