Sat, Apr 18, 2026
कृषी वार्ता

जमीन आरोग्य व्यवस्थापनासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक :डॉ संग्राम काळे

जमीन आरोग्य व्यवस्थापनासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक :डॉ संग्राम काळे
Ashok Ithape
  • PublishedApril 18, 2026
सातारा, दि. 16: रासायनिक खतांचे असमतोल वापरामुळे जमीन आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या सूचनेनुसार येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यायी खतांचा शेतकऱ्यांनी अवलंब करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र बोरगाव व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे शेळकेवाळी ता. सातारा येथे राबविण्यात आले.
या जनजागृती कार्यक्रमला  कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज चे मृदा शास्त्रज्ञ डॉ. संग्राम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. काळे यांनी माती परीक्षणसाठी नमुने गोळा करण्यासंदर्भात कृती करून दाखविले. ते म्हणाले, हंगामात रासायनिक खतांचा संतुलित वापर होण्यासाठी  पिकांच्या अन्नद्रव्यांसाठी केवळ रासायनिक खतांवरच अवलंबून न राहता जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय खते, शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, नाडेप खत व  हिरवळीचे खत वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे जमिनीच्या भौतिक व जैविक गुणधर्मात सुधारणा होते. अन्नद्रव्यांची उपलब्धता व उपयुक्तता वाढते. रायझोबियम, अझोटोबॅक्टर, पीएसबी व केएसएम यासारखे जिवाणू संवर्धक किंवा जिवाणू संघ प्रत्येक पिकात शिफारशीप्रमाणे बीजप्रक्रियेसाठी वापरल्यास रासायनिक खतांच्या वापरात बचत होते, असेही डॉ. काळे  म्हणाले.
पिकांना आवश्यक अन्नद्रव्याची गरज भागविण्यासाठी खतांची बाजारातील उपलब्धता, सद्य:स्थितीतील किमतीनुसार येणारा खर्च, कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार खतमात्रा आदी बाबींचा विचार करावा तसेच माती परीक्षणानुसार किंवा जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खतांचा वापर केल्यास शेतकऱ्यांना फायदा होतो , असेही डॉ. काळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमा प्रसंगी किन्वित सेंद्रिय खत प्रकल्पाअंतर्गत  ऊस पिकाच्या प्रात्यक्षिक प्रशेत्रावर शिवार फेरी आयोजित करण्यात आली.या प्रसंगी ऊस पिकातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
भूषण यादगीरवार यांनी प्रकल्प विषयी माहिती देताना सांगितले की भारत सरकारच्या गोबरधन योजनेअंतर्गत  मोजे शेळकेवाळी येथे ऊस पिकात दहा शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे.धनाजी फडतरे यांनी घणजीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
स्वागत प्रवीण शेळके यांनी केलं व आभार विद्या शेळके यांनी केलं.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!