Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

सातारकरांच्या भव्य दसरा मेळाव्यात सातारारत्न अन् साताराभूषण पुरस्कार वितरण

सातारकरांच्या भव्य दसरा मेळाव्यात सातारारत्न अन् साताराभूषण पुरस्कार वितरण
Ashok Ithape
  • PublishedOctober 13, 2024

वाई दि १३ :- मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात राहून तिथल्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सातारावासियांचा भव्य दसरा मेळावा दादर येथील शिवाजी मंदिर येथे दसऱ्याच्या पूर्वसंध्येवर आयोजित करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सातारारत्न आणि साताराभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या सातारा भवनसाठी एका भूखंडाची निवड केली असून लवकरच तो ताब्यात घेऊन त्याची निर्मिती केली जाईल, अशी सुखद घोषणा आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम (नाना) निकम यांनी भरगच्च सातारकरांच्या उपस्थितीत केली.

या कार्यक्रमावर रतन टाटा यांच्या निधनाचे सावट होते. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी प्रमुख अतिथी महंत स.भ. मोहनबुवा रामदासी, मठाधिपती श्री विठ्ठल स्वामी (महाराज) वडगांव जयराम स्वामी, कायदेतज्ज्ञ ऍड.उदय वारुंजीकर तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वितरीत करण्यात आलेले सातारा रत्न पुरस्कार असे – राजकीय रत्न – श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, कला रत्न – राहुल भंडारे, कामगार रत्न – मनोज धुमाळ, क्रीडा रत्न – विनया माने, साहित्य रत्न – अरुण गोडबोले , शैक्षणिक रत्न – अंजली गोडसे, सामाजिक रत्न – विकास धनवडे, उद्योग रत्न – शिवाजीराव माने, पत्रकारिता – निलेश बुधावले, वैद्यकीय रत्न – डॉ. अरुण माने, कायदा रत्न – ऍड.पांडुरंग पोळ, प्रशासकीय रत्न – सोमनाथ घार्गे (भापोसे ), सहकार रत्न – विनायक गाढवे. याशिवाय सातारभूषण पुरस्कार किरण सोनवणे, संपत शेवाळे, सुरेश गोडसे, प्राची कोल्हटकर-जांभेकर, कु. भार्गव जगताप यांना तसेच वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांना प्रदान करण्यात आले.

प्रमुख पाहुणे महंत मोहनबुवा रामदासी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सातारा जिल्ह्याचे महत्व विशद केले. या भूमीने अनेक महनीय व्यक्तींना देशकार्यासाठी घडविले, ही पावन भूमी असल्यामुळेच रामदास स्वामी यांनी मराठवाड्यातील जांब येथून सातारा जिल्ह्यात आपले वास्तव्य केले. सत्कारमूर्तींच्या वतीने प्राची कोल्हटकर-जांभेकर, सुरेश गोडसे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.

संघटनेचे अध्यक्ष नाना निकम, उपाध्यक्ष व माजी आमदार बाबुराव माने तसेच उपाध्यक्ष ऍड.राजाराम शिंदे, सचिव महेश पवार, खजिनदार दिपक यादव, सहखजिनदार श्रीधर फडतरे, विश्वस्त सर्वश्री दिनकर गाढवे, दत्ताजीराव फाळके, अनिल जाधव, सुभाष चव्हाण, एकनाथ तांबवेकर, शिवाजीराव जाधव, ऍड अशोक चव्हाण,प्रो रमेश मोरे, पद्मावती शिंदे, आसावरी भोईटे, सागर घाडगे, समर्थ देशमुख आदी विश्वस्त व इतर मान्यवर देखील उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!