Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार स्थानिकांना प्राधान्य देणार मुख्यमंत्री शिंदे

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार स्थानिकांना प्राधान्य देणार मुख्यमंत्री शिंदे
Ashok Ithape
  • PublishedMarch 9, 2024

मुनावळे येथील वॉटर स्पोर्ट जलपर्यटन केंद्राचा शुभारंभ

भुईंज: महेंद्रआबा जाधवराव

निसर्गाचं वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगातील कोयना जल पर्यटन केंद्र हे देशातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे व पाहिले जल पर्यटन केंद्र असून या माध्यमातून पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार या बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

इथल्या नागरिकांना रोजगारासाठी आता गाव सोडून जाण्याची गरज नाही तर गाव सोडून गेलेले पुन्हा गावाला येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

कोयना बॅक वॉटर, शिवसागर जलाशयात जागतिक दर्जाचे जलपर्यटन, वॉटर स्पोर्ट सुरु झाले आहे. एमटीडीसीद्वारे सुरु होत असलेला देशातील असा एकमेव प्रकल्प असून यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. या जलपर्यटन केंद्रावर स्थानिक लोकांना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे अशी सूचना या भागाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार याठिकाणी स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुनावळे ता. जावली येथे आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या अथक पाठपुराव्यानंतर शिवसागर जलाशयात जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र मंजूर करण्यात आले आहे. या वॉटर स्पोर्ट, जलपर्यटन केंद्राचा शुभारंभ ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंहराजे, आ. मकरंद पाटील, नाना पाटेकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ना. शिंदे बोलत होते.

ना. शिंदे म्हणाले, मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र सुरु झाल्याने या भागात पर्यटनवाढीला मोठी चालन मिळणार आहे. येथील विविध प्रकारचे प्रश्न आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मांडले असून ते सोडवण्यासाठी निश्चितच सकारात्मक निर्णय घेतला जाईल. या भागात सुरु असलेल्या रस्ते आणि मोठ्या पुलांच्या कामामुळे येथून थेट कोकणात जाता येणार असून पर्यटकांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जलपर्यटन केंद्रामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरु करण्यात आला असला तरी, याठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. स्थानिक लोक रोजीरोटीसाठी मुंबईला जात असतात. हे चित्र बदलावे यासाठीच या भागात पर्यटनवाढीला चालना देणे, विविध प्रकल्प आणणे यासाठी प्राधान्य देत आहे. मुख्यमंत्री हे या भागाचे सुपुत्र आहेत, त्यांनी स्थानिकांना प्राधान्य देऊन या भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सहकार्य करावे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, मुनावळे, बामणोली, शेंबडी, तापोळा आदी भागातील पदाधिकारी, विविध गावचे सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!