प्लास्टिक वापर करणाऱ्या व कचरा उघड्यावर फेकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि.२ :जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा कार्यक्षेत्रामध्ये नागरिकांकडून प्लास्टिक वापर सर्रास केला जात असल्याने जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी गाव व तालुका स्तरावरील पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्या .
महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ भारत मिशन उपक्रम जिल्ह्यामध्ये सर्व नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत आहे . जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीसाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई , जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी , मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता क्रांती बोराटे सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी या बैठकीस उपस्थित होते
स्वच्छता विभागाची बैठक 4 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली होती या अनुषंगाने एक महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये स्वच्छता सातत्य राखण्यासाठी गाव स्तरावर 1148 पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून 468 प्लास्टिक विक्रेते दुकानदार व उघडा वरती कचरा फेकणारी व्यक्ती यांच्यावर कारवाई करून 62,502 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच 7586 विक्रेते व लोकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. गाव स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत 1332 गावांमध्ये प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात आलेले आहेत. तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी 298 ग्रामपंचायत यांनी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत .
जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी गावांमध्ये उघड्यावरती कचरा फेकणाऱ्या लोकांची नावे पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत व त्या व्यक्तींच्याकडून दंड वसूल करणे यावा पुढील एक महिन्याच्या कालावधीमध्ये ही मोहीम अधिक कडक करण्यात यावी. तसेच तालुका व जिल्हा स्तरावरील भरारी पथकांनी अचानक भेटी देऊन जिल्ह्यातील मोठ्या पंचायती, बाजाराची गावे,पर्यटन स्थळे यामध्ये कडक कारवाई कराव्यात प्रत्येक गावातील रस्ते, चौक, गाव परिसर कचरामुक्त करण्यासाठी मोहीम स्वरूपात उपक्रम हाती घेण्यात यावा. या कामासाठी जिल्ह्यातील पोलिसांनी सहकार्य करावे.
सातारा जिल्ह्यातून कचरा ही समस्या कायमस्वरूपी घालवण्यासाठी गावपातळीवर जनजागृतीची उपक्रम करून लोकांची मानसिकता बदलण्याचे काम पथकांनी करावे अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.
जल जीवन मिशन अंतर्गत कामांचा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतला आढावा
जल जीवन मिशन हा केंद्र व राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी व कालबद्ध कार्यक्रम असल्याने सर्व कामे दर्जेदार व विहित मुदतीत पूर्ण होतील, याकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, व योग्य नियोजन करण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सातारा जिल्ह्यातील कामांचा आढावा बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग गौरव चक्के, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सातारा पल्लवी चौगुले, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कराड विजय वाईकर तसेच जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व उपअभियंता पाणीपुरवठा उपस्थित होते.
सदरील बैठकीत प्रगती पथावर असलेल्या कामांचा तालुका निहाय आढावा घेण्यात आला.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या तसेच कामाचा योग्य दर्जा न राखणाऱ्या ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले.
जल जीवन मिशन – प्रत्येक घरास नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी या उपक्रमांतर्गत कोणीही वंचित राहणार नाही याकरिता सदर योजनांमध्ये काही फेरबदल, सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास सदर प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.













