ताशाचा आवाज तरारा झाला..!
![]()
भुईंजमध्ये काल गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी ऐवजी पारंपरिक वाद्यांचा गजर झाला.
या डॉल्बीमुक्त मिरवणुकीचा आनंद खऱ्या अर्थाने सर्वांनी लुटला. जेष्ठ नागरिक देखील मोठ्या कौतुकाने विसर्जन मिरवणूक पहाण्यास आले.
ही मिरवणूक आनंदादायी झाली, त्याचे कारण डॉल्बी नसल्याने.
डॉल्बीचा फास सुटला तो काही सहजासहजी नाही. त्यासाठी ज्यांनी ज्यांनी लढा दिला त्या अमित उर्फ पपुभाई सुर्यवंशी यांच्यापासून सर्व ज्येष्ठ नागरिक आणि डॉल्बी बंदीसाठी झटणाऱ्या तमाम ग्रामस्थांचे कष्ट यापाठी आहेत.
डॉल्बीला विरोध सुरू झाला आणि लगेच डॉल्बी बंद झाली, असं इतक्या सहजपणे ते घडलं नाही.
त्यासाठी काहींचा विरोध सहन करावा लागला. पण कोणतेही चांगले काम करायचे म्हटले की माणसं अंगावर घ्यावीच लागतात, विरोध सहन करावाच लागतो.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना तर त्या मुलींना शिक्षण देतात म्हणून दगड आणि शेणाच्या गोळ्यांचा मारा सहन करावा लागला होता.
असो, दटून राहून डॉल्बी बंदीचा ठराव करायला लावला. पण, एवढ्यावरच लढा थांबला नाही. तर ग्रामसभेत झालेला ठराव पदरात पाडून घ्यायला मोजून पंधरा हेलपाटे मारायला लागले पंचायतीत.
ग्रामसभेत ठराव होऊनही तो कागदावर उतरून हातात घ्यायला पुन्हा धडका द्याव्या लागल्या.
त्या साऱ्या कष्टाचे चीज झाले आणि गाव डॉल्बीमुक्त झाले. त्याची अंमलबजावणी भुईंज पोलीस ठाण्याचे अधिकारी रमेश गर्जे व त्यांच्या टीमने प्रभावीपणे केली. त्यातून भुईंजचा आदर्श घेउन इतर गावातही डॉल्बी नको असा सूर उमटला.
या लढायचे फळ कालच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पहायला मिळाले. डॉल्बी वाजली नाही त्यामुळे आनंदाचे भरते अधिक जोमाने आले. डॉल्बी वाजली नाही त्यामुळे कोणाला जीवघेणा त्रास झाला नाही की कोणाला दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागल्या नाहीत.
डॉल्बीमुक्तीसाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे लाख लाख आभार, त्यांना मनापासून धन्यवाद. आणि गावाच्या हितासाठीच्या पुढच्या लढाईसाठी शुभेच्छा.
राहुल तांबोळी, भुईंज













