उमेद अभियानातून १ लाख ९० हजार महिला झाल्या लखपती
सातारा दि. 15 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) सातारा जिल्ह्याने महिला सक्षमीकरणात मोठी झेप घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 1 लाख 90 हजार महिला लखपती दिदी झाल्या असून, त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा स्तर उंचावला आहे. बँकांचे अर्थसहाय्य आणि शासनाच्या विविध निधींच्या जोरावर सातारा जिल्ह्यातील ग्रामीण महिला खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत.सातारा जिल्ह्यात हे अभियान सुरू झाल्यापासून महिलांचे संघटन मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरु झाल्यापासून सातारा जिल्ह्यात 22 हजार 187 स्वयंसहायता समुह बचत गट तयार करण्यात आले आहे. यामध्ये 2 लाख 21 हजार 380 कुटुंबांचा समावेश या अभियानांतर्गत आत्तापर्यंत 2 हजार 377 बचत गटांच्या महिलांना उद्योग उभारणीसाठी 122 कोटी 26 लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत.
21 हजार 664 बचत गटांना 32 कोटी 51 लाखांचा फिरता निधी वितरीत करण्यात आला आहे. 333 ग्रामसंघ यांना 3 कोटी 74 लाख, स्टार्टअप निधी 1 हजार 214 गटांना 9 कोटी 10 लाख तर 62 प्रभाग संघांना 2 कोटी 17 लाख रुपये वितरीत करण्यात आले.
महिला बचत गटांना बॅकांनी मोठ्या प्रमाणात अर्थ सहाय्य केले आहे. यामध्ये 56 हजार 627 बचत गटांना 1200 कोटी 6 लाख 63 हजार वितरीत करण्यात आले आहे. तर वैयक्तिक उद्योग व्यवसाय कर्ज 6 हजार 161 गटांना 100 कोटी 9 लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत.
या अभियानामुळे ग्रामीण भागातील महिला केवळ उंबरठ्याबाहेर पडल्या नाहीत, तर त्या आता उद्योजक झाल्या आहेत. स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्याने कुटुंबाचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे.
जिल्ह्यातील या ‘लखपती दिदी’ आता केवळ शेतीवर अवलंबून न राहता विविध प्रकारचे छोटे-मोठे उद्योग, गृहउद्योग आणि सेवा क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहेत.













