Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

दरड व भूस्खलनग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

दरड व भूस्खलनग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई
Ashok Ithape
  • PublishedJuly 28, 2025
सातारा दि.27- पाटण तालुक्यातील दरड व भूस्खलनग्रस्त 474 कुटुंबांची 151 तात्पुरत्या निवारा शेडमध्ये तात्पुरती सोय स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने मंजूर केलेल्या  घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पाटण तालुक्यातील सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकींना जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक निलेश गहने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्द, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाटण तालुक्यातील दरड व भूस्खलनग्रस्त कुटुंबांची संख्या 546 आहे. या सर्व कुटुंबांना कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी घरकुले मंजूर करण्यात आली
आहे. यासाठी निधीही मंजूर करण्यात आलेला आहे. धावडे येथे 79, काहीर 37, आंबेघर 30, गोकुळ तर्फ 8, चाफेर 102 येथे काम सुरू आहे. ही सर्व कामे गतीने पूर्ण करावीत. देशमुखवाडी येथील 192 घरकुलांचे काम पावसाळ्यानंतर त्वरित सुरू करावे.
 त्याबरोबरच मोडकवाडी येथील 88 घरकुलांच्या जागेसाठी पाहणी तातडीने करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
पापर्डे व येराड येथील जल पर्यटन केंद्राचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कामांची निविदा तात्काळ काढावी या कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या कामांमध्ये काही अडचणी असतील तर त्या तातडीने दूर कराव्यात.
कराड चिपळूण मार्गाचा आढावा घेताना पालकमंत्री देसाई म्हणाले, म्हावशी फाटा ते संगम धक्का मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व ठेकेदाराने मिशन मोडवर काम करावे. कुठे अतिक्रमणे असतील तर ती तातडीने काढावी, अशा सूचना करून वाटोळे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशिक्षण केंद्राच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!