खरीप हंगाम तयारी साठी कृषि विभाग, आत्मा व कृषि विज्ञान केंद्र बांधावर
वाई : सध्या सर्वत्र पाऊस जोरात सुरु आहे. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे शेतीची गणिते थोड्या प्रमाणात बदलली असली तरी येणाऱ्या परिस्थितीत शेतीचे पुढील नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र बोरगाव व महाराष्ट्र शासन कृषि विभाग , आत्मा विभाग यांनी थेट शेतकऱ्याच्या बांधावर संयुक्त मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या विकसित कृषी संकल्प अभियान व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या खरीप हंगाम मोहीम अंतर्गत मौजे उडतारे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री जितेंद्र कदम यांनी आधुनिक हळद लागवडीविषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच अति पाऊस व पावसाचा खंडित कालावधी यावेळी पिकाची कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी हळद पिकासंदर्भात शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसन ही करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी वाई श्री प्रशांत शेंडे यांनी यावेळी कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील शास्त्रज्ञ श्री संग्राम पाटील यांनी यावेळी सोयाबीन पीक लागवडीविषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. सतत चालू असल्या पावसामुळे खरीप हंगाम थोडा लांबणीवर पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषि अधिकारी श्री तानाजी यमगर यांनी व आभार प्रदर्शन डॉ कल्याण बाबर यांनी केल.
या कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र बोरगाव चे कार्यक्रम समन्वयक डॉ.महेश बाबर,डॉ भूषण यादगीरवार सर, उप कृषि अधिकारी श्री निखिल मोरे,श्री प्रदीप देवरे,बी टी एम,आत्मा योगेश जायकर ए टी एम, सर्व सहाय्यक कृषि अधिकारी, सरपंच, उपसरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













