डॉ.विजय कुंभार यांना यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
![]()
कर्मवीर पुण्यतिथीदिनी शरदचंद्र पवार यांचे हस्ते सन्मान
सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग विषयाचे विभागप्रमुख डॉ. विजय कुंभार यांची रयत शिक्षण संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ साठी निवड झाली असून ९ मे २०२५ रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष मान. शरदचंद्र पवार, संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन ऍड. भगिरथ शिंदे, सचिव श्री विकास देशमुख, संघटक डॉ. अनिल पाटील, संस्थेचे सर्व मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के , व विद्यापीठाचे अधिकारी ,संचालक , व स्टाफ यांनी त्यांचे अभिनंदन केले.
रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांनी केलेल्या अध्यापन, संशोधन, विस्तार सेवा, विद्यार्थी व समाजोपयोगी प्रकल्पात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो.
डॉ. विजय कुंभार हे गेली २० वर्षे रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात अर्थशास्त्र व बँकिंग विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी बँकिंग या विषयातून पीएच.डी संपादित केलेली आहे, त्यांचे बँकींग व अर्थशास्त्र या विषयातील ७० पेक्षा अधिक शोधनिबंध विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधुन प्रकाशित झाले आहेत.इलेक्ट्रॉनिक बँकिंग व ग्राहक समाधान या विषयात त्यांनी केलेले संशोधन उल्लेखनीय असून इलेक्ट्रॉनिक बँकिंग तथा मोबाईल बँकिंग सेवांचा दर्जा तपासणे व त्यामधून ग्राहक समाधानाचे मोजमाप करणे याबाबत त्यांनी विशेष संशोधन केलेले आहे.
धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व बँक मॅनेजमेंट विभागाच्या माध्यमातून तरुण-तरुणींना बँकिंग क्षेत्रात रोजगार विषयक संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे विशेष योगदान आहे.
रयत शिक्षण संस्थेचे पहिले स्वायत्त महाविद्यालय म्हणून धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय या महाविद्यालयास स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी देखील त्यांनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, रयतवाणी रेडिओ स्टेशन, टीसीएस कॅम्पस टू कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्राम, रयत सेंट्रल प्लेसमेंट सेल इत्यादींच्या प्रकल्पातही त्यांनी विशेष योगदान दिले असून सध्या ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या समूह विद्यापीठाच्या स्थापनेपासून प्रभारी कुलसचिव म्हणून कार्यरत असून या विद्यापीठाच्या उभारणीमध्ये ही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.













