Fri, Apr 17, 2026
सहकार

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या १० व्या कोल्हापूर शाखेचा स्थलांतर सोहळा संपन्न

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या १० व्या कोल्हापूर शाखेचा स्थलांतर सोहळा संपन्न
Ashok Ithape
  • PublishedOctober 29, 2024

वाई : उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या १० व्या कोल्हापूर शाखेचा भव्य स्थलांतर सोहळा मार्व्हलस ग्रुप चे अध्यक्ष मा श्री संग्राम पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कोल्हापूर येथे शाखा सुरु करून सर्व सामान्य व्यक्तींच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी कोल्हापूरवासीयांना एक उत्तम पर्याय उत्कर्ष पतसंस्थेने दिला आहे. निस्वार्थी संचालक मंडळ, पारदर्शक व्यवहार आणि प्रामाणिक कर्मचारी या त्रिसुत्रीच्या बळावर उत्कर्ष पतसंस्था लवकरच ११ वी शाखा देखील कोल्हापुरात सुरु करणार, असे वक्तव्य मा श्री संग्राम पाटील यांनी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. स्व आनंद कोल्हापुरे यांनी १९९९ साली स्थापन केलेल्या उत्कर्ष पतसंस्थेची कोल्हापूर येथे शाखा सुरु करणे म्हणजे संस्थेप्रती ग्राहकांचा असणारा स्नेह, निष्ठा आणि विश्वासाचा विजय आहे.

संस्थेचे हितचिंतक व अनेक ग्राहकांच्या आग्रहास्तव संस्थेने कोल्हापूर येथे गेल्या वर्षी छोट्याश्या गाळ्यात शाखा सुरु केली. मात्र कोल्हापूरकरांनी संस्थेवर दाखविलेले प्रेम व विश्वास यामुळे संस्थेने कोल्हापूरच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या मंगळवार पेठ खरी कॉर्नर येथे भव्य वास्तूमध्ये शाखा स्थलांतर केली आहे. कोल्हापूरकरांचे संस्थेवर असलेले प्रेम व विश्वास असाच वृद्धिंगत होत राहो असे मनोगत मा अध्यक्ष श्रीमती अनुराधा आनंद कोल्हापुरे यांनी याप्रसंगी व्यक्त केले व रक्कम रुपये १ लाख ची शुभेच्छापर ठेव ठेवली.

या स्थलांतर सोहळा प्रसंगी कोल्हापूर येथील प्रतिष्ठित मान्यवर एस एस के एस समाजाचे अध्यक्ष श्री तुळशीरामसा लटकन, उद्योजक श्री सहदेव वाळवेकर, जगदंबा ट्रस्टचे अध्यक्ष श्री किशोर मेहेरवाडे, एस एस के एस समाजाचे उपाध्यक्ष श्री दिलीप मैत्राणी, उद्योजक श्री धनंजय इंदुलकर, ॲड मांगवे, उत्कर्ष पतसंस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री श्रीपाद कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री आनंदराव चव्हाण यांनी संस्थेत ठेव ठेवली, त्याप्रती त्यांचा देखील सन्मान करण्यात आला.

तसेच संस्थेचे मार्केटिंग करताना संस्थेचे कर्मचारी यांनी कोल्हापूर येथील एका सर्वसामान्य व्यक्तीची हरवलेली सोन्याची अंगठी शोधण्यास मदत करून ती त्या ग्राहकास मिळवून दिली, कर्मचाऱ्यांच्या या सामाजिक बांधिलकी व प्रामाणिकपणाच्या प्रति श्री योगेश दाहोत्रे,श्री जयदीप कांबळे,श्री महेश पोळ,श्री सुरज पाटणे,श्री संकेत जाधव,श्री महेश खुडे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कोल्हापूर शाखेचे अधिकारी श्री सुनील भोसले,कर्मचारी श्री महेश निकम,श्री वैभव गोसावी,मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाश पवार यांचा देखील सन्मान याप्रसंगी करण्यात आला. या स्थलांतराच्या निमित्ताने संस्थेने नव्याने ग्राहक होणाऱ्या प्रत्येकासाठी लकी ड्रॉ द्वारे आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी दिली होती , ज्याची सोडत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. त्यामध्ये विजेत्या झालेल्या माजगावंकर शांताराम सिताराम, गोसावी विशाल धोंडीराम, ढोकरे अंजना कृष्णा, पाटील प्रभाकर विदु ग्राहकांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ रंगता बेडेकर यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्रीमती अनुराधा कोल्हापुरे , उपाध्यक्ष श्री रमेश यादव , संचालक श्री अमर कोल्हापुरे , श्री मदनकुमार साळवेकर , श्री वैभव फुले , श्री भूषण तारू , श्रीमती नीला कुलकर्णी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!