सण वटपौर्णिमेचा, उत्साह सामाजिक वणीकरणाचा
चिंधवल, दिपक पवार :
नावाप्रमाणेच सर्व ज्येष्ठ वैशिष्ट्ये धारण करणारा हा महिना म्हणजे जेष्ठ महिना. ऋतूचक्रातील सर्वांत मोठा दिवस याच महिन्यात असतो. ग्रीष्माची चाहूल लागलेली, आभाळ भरून आलेले, त्यामुळे वातावरणात उष्मा वाढलेला, मध्येच पावसाची हलकी सर येणार्या पावसाळ्याची आठवण करून देतो.
निरोप घेणारा उन्हाळा नि सुरू होणारा पावसाळा यांची गळाभेट या महिन्यात आपल्याला पाहता येते आणि या वातावरणाला धार्मिक अधिष्ठानही लाभले आहे.
वटपौर्णिमेचेही तसेच आहे. सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी सावित्रीने याच दिवशी वडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या महिन्यात सर्व सुवासिनी सौभाग्यरक्षणासाठी वडाची मनोभावे पूजा करतात. सातही जन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात.
या व्रतामागच शास्त्र लक्षात घेऊन वड ही उपयुक्त वनस्पती आहे. वडामुळे ऊन पावसापासून आपल्या संरक्षणाबरोबर तापल्या उन्हातून जाणारा पांथस्थ वडाखाली थांबतो तेव्हा त्याचा सारा शीण नाहीसा होतो. या वडाच्या सहवासात कावळे, घार, गिधाड (पर्यावरणाची स्वच्छता करणारे पक्षी) यांच्यासह चिमण्या, पारवे, पोपट आदी पक्षीही राहतात.
आणि म्हणूनच महिला वर्ग वटपौर्णिमेला सणाला वटवृक्षाची मनोभावे पूजा करताना सातही जन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात, त्याच प्रमाणे या वटवृक्षासारखीच कुटुंबाची आर्थिक भरभराट चोहोबाजूंनी मोठी होऊन सुखशांती, ऐश्वर्य आणि निरोगी आरोग्य याचा सहवास मिळावा म्हणूनच या दिवशी महिलावर्गाबरोबर, पुरुषवर्गानेही बालमित्रमैत्रीणींना सोबत घेऊन समाजभावनेतून नवीन वटवृक्षाचे रोपन करावे त्यामुळे बालमित्रमैत्रीणींना वृक्षारोपणाची जाणीव होईल.
आत्ताचे पाऊसाचे प्रामाण कमी लक्षात घेता वटवृक्षाचे रोपण कुंडीमध्ये करून पावसाचे प्रमाण सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर ते योग्य ठिकाणी लावून त्याची योग्यप्रकारे निगा घेणे हितवाह ठरेल त्यातून सामाजिक बांधिलकीतून वणीकरणाची चळवळ रुजवली जाईल, जमीनीची धूप थांबून पाणी जिरवण्याचा मार्ग सुकर होईल आणि दुष्काळाचे सावट थोड्याफार प्रमाणात तरी कमी होण्यास मदत होऊन त्यातून सामाजामध्ये नक्कीच पूरक व पोषक संदेश जाईल..
चला तर मग वटवृक्षाची रोपे अगोदरच आपाआपल्या घरी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करुयात.













