बावधनची प्रसिद्ध बगाड यात्रा ८ मार्चला; भक्ती-श्रद्धेचा महासंगम अनुभवायला सज्ज!
![]()
यावर्षी बगाड्याचा मान श्री विठ्ठल सोपान कदम यांना; १६ वर्षांपूर्वी केलेला नाथांचा नवस अखेर पूर्णत्वास
वाई l प्रतिनिधी : वाई तालुक्यातील बावधन येथे होणारी जगप्रसिद्ध बगाड यात्रा रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी भक्तिभावात आणि पारंपरिक उत्साहात संपन्न होत आहे. सातारा जिल्ह्यातील ही अनोखी व ऐतिहासिक यात्रा श्रद्धा, शक्ती आणि भक्तीच्या संगमाचे प्रतीक मानली जाते.
यावर्षीचा बगाड्याचा मान श्री विठ्ठल सोपान कदम यांना मिळाला आहे. सुमारे १६ वर्षांपूर्वी, त्यांचे बंधू श्री रविंद्र सोपान कदम आजारी असल्याने त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांनी नाथांना नवस केला होता. दीर्घ प्रतीक्षेनंतर तो नवस यंदा पूर्णत्वास जात असून, या प्रसंगाला भाविकांतून विशेष महत्त्व दिले जात आहे.
यात्रेच्या दिवशी पहाटेपासूनच गावात भक्तांची गर्दी उसळते. पारंपरिक विधी, ढोल-ताशांचा गजर, “नाथांचे चांगभले”चा जयघोष आणि बगाड उभारणी-उतारणीचे क्षण भाविकांना आध्यात्मिक अनुभूती देतात. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
“काशीनाथाचे चांगभले…!” या जयघोषात न्हाऊन निघणारी बावधनची बगाड यात्रा यंदाही श्रद्धाळूंना भक्तीच्या अद्वितीय अनुभूतीकडे घेऊन जाणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्ती-श्रद्धा-शक्तीच्या संगमाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.













