योजनांचा लाभ हवाय; मग ‘धोम’ ला चला !
सातारा दि.२५- शासनाच्या कल्याणकारी योजना केवळ कागदावर मर्यादित न राहता, त्या समाजातील शेवटच्या आणि गरजू घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. प्रशासन आणि विधी सेवा प्राधिकरणाने समन्वयाने काम केल्यास वंचितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असे प्रतिपादन ए. एस. वाघमारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री. नरसिंह हायस्कूल धोम, ता. वाई, जि. सातारा मध्ये महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. राजेश एस. पाटील उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती जिल्हा सातारा आणि माननीय न्यायमूर्ती श्री. रणजीतसिंह राजा भोसले उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती यांचे हस्ते होणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत चालणाऱ्या या मेळाव्यात नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला, तक्रार निवारण आणि विविध शासकीय योजनांची प्रत्यक्ष माहिती दिली जाईल. या शिबिरात आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, महिला व बालविकास, पोलीस, आर.टी.ओ. आणि कौशल्य विकास अशा विविध विभागांचे स्टॉल्स लावले जाणार आहेत. विशेषता महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांवर अधिक भर दिला जाणार आहे.













