Mon, Mar 2, 2026
सहकार

‘बेस्ट रिकन्स्ट्रक्शन ऑफ शुगर मिल पुरस्कार’ ‘किसन वीर’ला जाहिर

‘बेस्ट रिकन्स्ट्रक्शन ऑफ शुगर मिल पुरस्कार’ ‘किसन वीर’ला जाहिर
Ashok Ithape
  • PublishedJuly 12, 2025

१८ तारखेला पुरस्कार वितरण समारंभ; प्रमोद शिदे यांची माहिती

दि.१२ : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व किसन वीर कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच खासदार नितीनकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर कारखान्यास भारतीय शुगर मार्फत देण्यात येणारा ‘बेस्ट रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक युनिट फॉर शुगर मिल’ हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे कोल्हापूर येथे शुक्रवार (दि.१८) रोजी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.

श्री. शिदे पुढे म्हणाले की शेतकरी व कामगारांच्या हितैषी किसन वीर व खंडाळा कारखाना ताब्यात मागील तीन हंगाम सुरळीत व कोणत्याही वित्तसंस्थेचे सहाय्य न घेता पार पाडले. इतर कारखान्याच्या बरोबरीने दर देत य शेतकरी वर्गाचा विश्वास संपादन केला तर कारखान्याकडे करार करणारे तोडणी मुकादम, वाहन मालक यांनाही वेळेवर अ‍ॅडव्हान्स तसेच फायनलची बिले दिल्यामुळे त्यांच्याही विश्वासास नामदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनास यश मिळाले.

नामदार मकरंदआबा पाटील यांच्या प्रयत्नातुन शासनाचे मिळालेले अर्थसहाय्य व त्याचा योग्य पद्धतीने केलेले विनियोग याचे कौशल्य पाहून कारखान्यास मिळालेली नवसंजीवनी तसेच कार्यकारी संचालक जितंद्र रणवरे यांची तत्परता या सर्वांची दखल घेत भारतीय शुगरने किसन वीर कारखान्यास यावर्षीचा ‘बेस्ट रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक युनिट फॉर शुगर मिल’ या पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले. याबाबतचे पत्र संस्थेचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, सीईओ संग्रामसिंह शिंदे व विश्वस्त रणवीरसिंह शिंदे यांनी सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन, कारखान्याचे मार्गदर्शक संचालक खासदार नितीनकाका पाटील यांचेकडे सुपुर्द करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मागील थकीत व चालूची सर्व शासकीय देणीही दिल्यामुळे मागील पंधरवड्यातच कारखान्यास ‘टॉप टॅक्स पेअर’चा पुरस्कार मिळाला व आता भारतीय शुगरचा ‘बेस्ट रिकन्स्ट्रक्शन ऑफ शुगर मिल पुरस्कार’ मिळाल्याने सभासद शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून कामगारांनादेखील नव्या उमेदीने व उत्साहाने काम करण्याची स्फूर्ती मिळणार असल्याची भावना यावेळी व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी व्यक्त करून शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण पिकविलेला ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यास गळितासाठी देऊन दोन्ही कारखान्याची गळिताचे उदिष्ठ पुर्ण करण्याचे आवाहन केलेले आहे.

भारतीय शुगरचा ‘बेस्ट रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक युनिट फॉर शुगर मिल’ पुरस्कार मिळाल्याने कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील व व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी वर्गाचे अभिनंदन केलेले आहे.

‘किसन वीर’च्या पंखात बळ आल्याचे समाधान- खासदार नितीनकाका पाटील

किसन वीर ताब्यात घेतल्यानंतर त्याचे वास्तव पुढे आल्यानंतर हा गाळात रूतलेला कारखाना कसा बाहेर काढणार याबाबत आम्ही चिंतीत होतो. शेतकरी सभासद व कामगारांनी टाकलेला विश्वास व कारखान्याचे आराध्य दैवत श्री माणकाईमाता देवीच्या आशिर्वादाने मागील तीन वर्षात प्रयत्नांची पराकाष्टा करीत हा गाळात रूतलेला कारखाना हळुहळु बाहेर काढण्यास नामदार मकरंदआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला यश मिळालेले असून शेतकऱ्यांनी यापुढील काळात अशीच साथ देऊन गाळपाचे उद्दिष्ठ पुर्ण करण्यास सहकार्य करावे. मागील तीन हंगाम यशस्वीरित्या पार पाडल्याची दखल घेत भारतीय शुगरने ‘बेस्ट रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक यूनिट फॉर शुगर मिल’चा बहुमान दिल्याने किसन वीरच्या पंखात बळ आल्याचे समाधान मिळाले असून यापुढील काळात नव्या उमेदीने फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशाला गवसणी घालणार असल्याची भावना यावेळी खासदार नितीनकाका पाटील यांनी व्यक्त केली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!