“वृक्षसंवर्धनाची अखंड साधना; तानाजी फणसे यांचा ‘वन संगोपन रत्न लोकहिंद गौरव पुरस्कार 2026’ ने सन्मान”
![]()
पर्यावरण रक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या तानाजी फणसे यांच्या कार्याचा गौरव
नवी मुंबई : ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या शानदार आणि उत्साहपूर्ण सोहळ्यात पर्यावरण व वृक्षारोपण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे तानाजी फणसे यांना ‘वन संगोपन रत्न लोकहिंद गौरव पुरस्कार 2026’ प्रदान करून गौरविण्यात आले. हा त्यांच्या आयुष्यातील २७ वा पुरस्कार ठरला असून, पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या निस्वार्थ सेवेला मिळालेली ही मोठी पावती मानली जात आहे.
वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृती या माध्यमातून समाजात हरित क्रांतीची चळवळ उभी करण्यासाठी तानाजी फणसे यांनी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेत मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर तानाजी फणसे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. वृक्ष हेच खरे जीवन असून, पर्यावरणाची सेवा माझ्याकडून अशीच सातत्याने होत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
त्यांच्या कार्यामुळे अनेक युवक आणि सामाजिक संस्था वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होत असून, पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होत आहे.





















