Mon, Apr 20, 2026
सातारा जिल्हा

सहकारी संस्थांनी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करावेत : प्रवीण दरेकर

सहकारी संस्थांनी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करावेत : प्रवीण दरेकर
Ashok Ithape
  • PublishedApril 20, 2026

सातारा दि. 20 : ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही विविध सहकारी संस्थांवर अवलंबून आहे. ज्या संस्था सध्या अडचणीत किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, त्यांना पुन्हा ऊर्जीत अवस्थेत आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, केवळ शासनावर अवलंबून न राहता सहकारी संस्थांनी स्वतःचे उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण केले पाहिजेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात सहकार चळवळीसमोरील आव्हाने व उपाययोजना या विषयावर आयोजित चर्चासत्रात श्री. दरेकर बोलत होते. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा खासदार नितीन पाटील, बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक धनंजय शेडगे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. दरेकर म्हणाले, सहकारी संस्थांना शासन मदत आणि अनुदान देत आहे, परंतु त्यासोबतच संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे अधिक गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्राला सहकाराची मोठी परंपरा लाभली आहे. येथील जिल्हा बँक शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करून मोठी ताकद देत आहे. सभासदांनीही सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करून संस्थांचे बळकटीकरण करावे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्था अनेक अडचणींवर मात करून उत्कृष्ट कार्य करत आहेत. या संस्थांना जिल्हा बँकेचे नेहमीच सहकार्य लाभते. संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा खासदार श्री. पाटील म्हणाले, जिल्हा बँक ही जिल्ह्याची अर्थवाहिनी असून देशात अग्रणी बँक म्हणून ओळखली जाते. सहकार क्षेत्रात शिस्त आणि प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा चर्चासत्रांमुळे संस्थांचे अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक धनंजय शेळके यांनी केले. चर्चासत्रास विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!