Fri, May 29, 2026
Close

Recent Posts

साहित्य

“सहज संवाद” पुस्तकाचा साताऱ्यात प्रकाशन सोहळा संपन्न

“सहज संवाद” पुस्तकाचा साताऱ्यात प्रकाशन सोहळा संपन्न
Ashok Ithape
  • PublishedMarch 4, 2026

प्रा. संभाजी लावंड लिखित तिसऱ्या पुस्तकालाही विविध स्तरातून प्रतिसाद

सातारा / प्रतिनिधी : वाई, जि. सातारा येथील सहजयोगी प्रा. संभाजी लावंड यांनी प.पू.श्री निर्मला देवी माताजींनी स्थापित केलेल्या सहजयोगावर निरंतर अभ्यास करुन लिहिलेल्या “सहज संवाद” या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच साताऱ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात झालेल्या २७ वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनातील सारस्वतांच्या सहवासात हा सोहळा संपन्न झाला.
कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर, इंगळी यांच्यातर्फे रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज येथे आयोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रा. राजेंद्र सुंदरदास फंड, ता. राहता जि.अहिल्यानगर यांनी भुषवले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. श्रीकांत पाटील घुमकी यांची उपस्थिती होती. डाॅ. शिवाजी शिंदे सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा अधिकारी, पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे शानदार प्रकाशन करण्यातआले.
यावेळी लेखक, कवी, प्रकाशक व मातृभक्त सी.ए. घनश्याम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय कवी संमेलनात महाराष्ट्रातून आलेल्या मुंबई, पुणे, सोलापूर, बार्शी, बुलढाणा, शेगाव , वाशिम, सातारा, कराड, बेळगाव, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यातील कवी व कवयित्री यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या सर्व मान्यवर व साहित्यिकांच्या उपस्थितीत विविध २७ पुस्तकाचे प्रकाशन झाले. शिवरायांचे प्रतिमेचे पूजन कवी दीपक पवार यांनी केले.

सहज योग या पुस्तकाचे लेखक प्रा. संभाजी लावंड हे सेवानिवृत्त प्राध्यापक असून यापूर्वी दोन गुराखी व वलाफोक असे ग्रामीण कथासंग्रह लिहलेले आहेत.आपल्या वैशिष्ट्य पूर्ण लेखन शैलीतून त्यांनी स्वतःचा एक खास वाचक वर्ग निर्माण केला आहे. लोकप्रिय ग्रामीण साहित्यिक म्हणून ते सुपरिचित आहेत. साताऱ्यातील शब्दप्रभू पब्लिकेशन्स यांनी प्रकाशित केलेले “सहज संवाद” हे पुस्तक त्यांनी श्री निर्मला देवी माताजींच्या सहज योगावर लिहिलेले आहे. याशिवाय “सहज चैतंन्य जागर” या पुस्तकाचे पुस्तकाचे लेखन सुरू असून लवकरच त्याची प्रकाशन होणार आहे.
या प्रकाशन समारंभास सातारा येथील सहजयोगी डॉ. बलदेव निकम व त्यांचे कुटुंबीय, प्रा.सरस्वती वाशिवले व ज्येष्ठ कवी सुभाष कळशे आणि साहित्य रसिक आवर्जून उपस्थित होते.

फोटो ओळी : सातारा येथील संमेलनात “सहज संवाद” या पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!