Fri, May 29, 2026
Close

Recent Posts

सातारा जिल्हा

महाराष्ट्राच्या विकासाचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगदान देणे हीच खरी श्रध्दांजली ठरेल – जिल्हाधिकारी संतोष पाटील

महाराष्ट्राच्या विकासाचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगदान देणे हीच खरी श्रध्दांजली ठरेल – जिल्हाधिकारी संतोष पाटील
Ashok Ithape
  • PublishedFebruary 7, 2026

सातारा दि. 2 : महाराष्ट्राच्या विकासाची व्यापक दूरदृष्टी असणारे अत्यंत प्रगल्भ असे व्यक्तिमत्त्व दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रुपाने राज्याला मिळाले होते. महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प त्यांच्या दूरदर्शीपणातून साकारले आहेत. महाराष्ट्राच्या विकासाचे आणि व्यापक जनहिताचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण महत्त्वपूर्ण योगदान देणे हीच खरी त्यांना श्रध्‌दांजली ठरेल, अशा भावना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केल्या.

दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रशासनातील सर्व विभागांच्यावतीने श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधिक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिाकार्जुन माने, जलसंपदा विभागाचे अभय काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राहुल देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, अजित दादां सारखे व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी फार मोठा कालखंड जावा लागतो. अशा व्यक्तिमत्वां बरोबर काम करताना आपलीही जडणघडण होत असते. प्रशासनाला सुस्पष्ट निर्णय देणारे आणि दिशा देणारे नेतृत्व हवे असते. अजित दादा पवारांमध्ये ही स्पष्टता होती.  त्यामुळे निर्णयांच्या अंमलबजावणीत कोणतीही कमतरता राहत नसे. एकदा निर्णय घेतल्यावर ते त्यावर ठाम असत. व्यापक जनहिताचे निर्णय ते विनाविलंब घेत,  तसेच घेतलेला निर्णय तडीस जाईल याबाबत ते अधिक जागृत असत. कर्तव्य कठोरता, वक्तशीरपणा, चतुरस्त्रपणा, अष्टावधानी, हजरजबाबी हे सर्व गुण त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हळहळला. एवढेच नव्हे तर प्रत्येकाच्या मनात एक भीषण अशी पोकळी निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्याच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले सातारा जिल्ह्यावर अजित पवार यांचे विशेष प्रेम होते. जिल्ह्यातल्या प्रत्येक प्रश्नाबाबत,  मागणीबाबत त्यांना इत्यंभूत माहिती होती. सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि सैनिक स्कूल यांच्या विकासात त्यांचे फार मोठे योगदान आहे. साताऱ्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी, नाविण्यपूर्ण उपक्रमांसाठी त्यांनी सदैव सढळ हस्ते निधी उपलब्ध करुन दिला. त्यांच्या जाण्याने आपण एक उत्तम प्रशासक आणि पालकही गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात, प्रशासनात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

यावेळी पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी अजित पवार हे जवळपास 35 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय असणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. वक्तशीरपणा, विनविलंब निर्णय, शिस्त, स्थापत्य इमारतींबाबतची सौंदर्यदृष्टी हे सारे गुण त्यांच्यात ओतप्रोत भरले होते. त्यांच्या जाण्याने राजकारण, प्रशासन आणि जनसंपर्क या क्षेत्रांची मोठी हानी झाली असल्याचे सांगितले.

अभय काटकर यांनी अजित पवार यांना ग्रामीण व शहरी भागातील प्रश्नांची उत्तम जाण होती. पुढील 25 वर्षांचे व्हिजन ठेवून काम करणारे ते लोकनेते होते. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राने खूप मोठा लोकनेता गमावला आहे, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिवगंत अजित पवार यांनी स्पष्टता,  खंबीरपणा, शिस्त यांचा वस्तूपाठ घालून दिला आहे. अशा व्यक्तिमत्त्व जाण्याने आपण खंबीर पालकही गमावला आहे,  असे सांगितले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राहुल देसाई यांनी प्रशासनातील सर्व बारकावे माहित असणारे व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त‍ केली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!