Mon, Mar 2, 2026
चालू घडामोडी सातारा जिल्हा

विहीर अधिग्रहणाच्या तहसिलदारांच्या अधिकारांना 31 जुलै पर्यंत मुदतवाढ

विहीर अधिग्रहणाच्या तहसिलदारांच्या अधिकारांना 31 जुलै पर्यंत मुदतवाढ
Ashok Ithape
  • PublishedOctober 5, 2023

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला जिल्हयातील पाणी टंचाई परिस्थितीचा आढावा

सातारा दि.5 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये सदयस्थितीला खंडाळा, पाटण, जावली, महाबळेश्वर, सातारा या तालुक्यामध्ये पाऊस कमी झाला आहे. तसेच माण खटाव,फलटण कोरगाव, वाई, कराड या तालुक्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.  या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. या  बैठकीत कमी प्रमाणात पाऊस झालेल्या तालुक्यामध्ये पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

 पाणीटंचाई संदर्भात सर्व तालुक्यांनी आराखडे यापूर्वी सादर केले आहेत. आराखडयातील गावांव्यतिरिक्त ज्या गावांची नव्याने मागणी येत आहे त्यांचा समावेश आराखडयात करून सदरचे पुरवणी आराखडे तातडीने कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. सातारा कार्यालयाकडे सादर करावेत. यामध्ये विहीर अधिग्रहण, टँकर या बाबींचा प्रामुख्याने समावेश करावा तसेच सदरचे आराखडे सादर करताना संबंधीत मंडळामध्ये किती टक्के पाऊस झाला आहे या बाबतचा अहवाल संलग्न करावा.

ज्या ठिकाणी शासकीय टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो तेथील डिझेलची देयके तातडीने जिल्हा परिषदेकडे सादर करावीत सदरच्या देयकांना त्वरीत निधी उपलब्ध करून दिला जाईल. डिझेल बिना गावांना टँकर मिळत नाही अशी परिस्थिती कोठेही उदभवू नये याबाबतची सर्वांनी दक्षता घ्यावी. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही डिझेल निधीची मागणी पाठविण्याबाबत सूचना दिल्या.

ज्या तालुक्यामधे उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याबाबत मागणी होत आहे त्यांनी सदर प्रस्ताव सातारा सिंचन मंडळाकडे तातडीने सादर करावेत. व त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी.

ज्या तालुक्यातील तलाव / पाझर तलाव पाणीसाठे या ठिकाणी गाळमुक्तचे काम सुरु करता येणे शक्य असेल त्या ठिकाणी ही कामे  सुरु करावीत. यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेऊन अथवा जे खाजगी शेतकरी स्वतः गाळ उपसण्यास इच्छूक असतील त्यांना सेवाभावी संस्था गृहीत धरून त्या बाबतचे प्रस्ताव तातडीने मृद व जलसंधारण विभागाला पाठवावेत व सदरीची कामे सुरु करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही करावी.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडील अहवाला प्रमाणे सातारा जिल्हयामध्ये खरीप हंगामामध्ये प्रत्यक्ष पेरणी 1 लाख 45 हजार 292 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर करण्यात आली आहे. त्यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, इ. तृणधान्य व तूर, मूग, उडीद इ.कडधान्य तसेच भूईमुग, तिळ, कारळे, सोयाबीन इ. गळीत धान्य तसेच कापूस या पिकांचा समावेश आहे. दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत होणा-या सरासरी खरीप पेरणीच्या प्रमाणात आज अखेर झालेली पैरणी केवळ 50 टक्केच आहे. त्यामुळे टंचाई सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी उपाययोजनात्मक कार्यवाही सुरु करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

त्या अनुषंगाने माण तालुक्यात 38 गावे व त्या अंतर्गत 255 वाड्या वस्त्यामध्ये 40 टँकर चालू आहेत, तसेच 3 विहिर व 10 विंधनविहिरी अधिग्रहण करणेत आल्या आहेत. खटाव तालुक्यामध्ये 2 गावामध्ये 2 टँकर चालू आहेत तसेच 5 विहिरी व 14 विंधनविहिर अधिग्रहण करणेत आल्या आहेत, कराड तालुक्यामध्ये 5 गावामध्ये 3 टँकर चालू आहेत तसेच 6 विहिरी व 2 विंधनविहिर अधिग्रहण करणेत आल्या आहेत, कोरेगाव तालुक्यामध्ये ३ गावासाठी 2 टँकर चालू आहेत तसेच 5 विहिरी व 1 विधनविहिर अधिग्रहण करणेत आली आहे, फलटण तालुक्यामध्ये 2 गावे व 15 वाड्यावस्त्यामध्ये 4 टँकर चालू आहेत. तसेच 1 विहिर अधिग्रहण करणेत आली आहे, वाई तालुक्यामध्ये 6 गावे व 3 वाड्यावस्त्यामध्ये 3 टँकर चालू आहेत तसेच 8 विहिर अधिग्रहण करणेत आली आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

 

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!