Mon, Mar 2, 2026
कृषी वार्ता

पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
Ashok Ithape
  • PublishedMay 28, 2025
सातारा दि.26-पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे ब्रिटिशकालीन आहे. या केंद्रामध्ये सोयी सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक असून केंद्राच्या बळकटीकरणासाठी व सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.
कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी फलटण तालुक्यातील पाडेगाव व संशोधन केंद्राला भेट देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे महासंचालक रावसाहेब बागडे, राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. साताप्पा खरबडे, मध्यवर्ती व संशोधन केंद्राचे ऊस विशेषतज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांच्यासह ऊस संशोधन केंद्रातील अधिकारी उपस्थित होते.
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने संशोधन करून नवनवीन उसाचे वाण विकसित केले आहे. या वाणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन झाले आहे. या संशोधन केंद्राचे देशात अत्यंत चांगले काम आहे. या केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा आराखडा शंभर वर्षाचा विचार करून तयार करावा. यामध्ये शेतकऱ्यांसाठी निवासी प्रशिक्षण सभागृह, निवासाची सोय, अत्याआधुनिक प्रयोगशाळा यासह विविध सोयी सुविधा उपलब्ध निर्माण कराव्यात. या कामासाठी निधीची अडचण वाचून देणार नाही अशी ग्वाही कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी दिली.
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने उसाच्या विविध वाण संशोधन करून विकसित करावे, शेतकऱ्यांना ऊस लागवडी बाबत वेळोवेळी मार्गदर्शन करावे अशा सूचना करून कृषीमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, कृषी विभागाच्या योजना, विविध बियाणे, खते यांची माहिती व्हावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर होर्डिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना सोपी व सहज शेती करण्यासाठी मार्गदर्शनाबरोबर सहकार्य शासनामार्फत करणार असल्याचेही कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!