इतरांसाठी जगलात आता स्वतःसाठी आनंदाने जगा..
भुईंज : महेंद्र जाधवराव
साठ वर्षाच्या काळात कुटुंबातील प्रत्येकासाठी, नोकरीत मातृसंस्थेसाठी झटलात. अहोरात्र कष्ट उपसून इतरांसाठीच जगत आलात आता सेवानिवृत्तीच्या नंतर स्वतःसाठी जगा आणि आनंदी आयुष्य सार्थकी लावा, असा मोलाचा सल्ला मुख्य शेती अधिकारी विलासराव पाटील यांनी दिला. कार्यक्रमास कार्यालय अधीक्षक सयाजीराव पाटील, माजी कामगार संचालक नितिन भोसले व मान्यवर उपस्थित होते.
आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (महाराजसाहेब) यांचे कल्पक व कुशल नेतृत्वाखाली तसेच कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते साहेब यांच्या उत्तम प्रशासनाखाली नावाजलेल्या अजिंक्यतारा सह. साखर कारखान्याच्या शेती व ऊस विभागातील आर. एम. जाधव, भरत घोरपडे, चंद्रकांत देशमुख,सुधाकर सावंत यांच्या सेवानिवृत्ती समारंभात पाटील साहेब बोलत होते.
या वेळी बोलताना ते पुढे म्हणाले, इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृत्तीचा दिवस. कामावर असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर काय काय करू याची स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात. पण न कळत हा दिवस आल्यानंतर नकळतच अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. आयुष्याची सेकंड इनिंग सुरु झालेली असते. पण ज्या मित्रांच्या व सहकाऱ्यांच्या साथीने आपण आयुष्यातील जे दिवस घालवलेले असतात ते पुन्हा येण्याची संधी आयुष्यात परत मिळणार नसते. म्हणून काहीसे हिरमूसले होतात.

मात्र आमची साथ सोडून तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात. वाईट वाटून घेऊ नका आठवणी आपल्या सदैव ताज्या राहणार आहेत. आला आनंदाचा क्षण, आता तुम्ही जगू शकाल आयुष्यातील प्रत्येक उरलेला क्षण, अशा भावनिक शब्दात पाटील साहेब यांनी सर्व सेवानिवृत्तीना आनंदमयी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अशोकराव यादव (बापू)
महेंद्र जाधव (आबा), गजानन विभुते आणि हरिभाऊ शेलार यांची शुभेच्छापर भाषणे झाली.
निरोपाच्या वेळी नुसतं उदास व्हायचं नसतं तर थोडं हसायच सुद्धा असतं… जरी डोळ्यात पाणी येत असलं तरी ते गालावर आणायच नसत . निरोपाच्या वेळी असे गुंतवायचे नसतात हातात हात केवळ स्पर्श सांभाळायचा असतो मखमली हृदयात गेलेले काही सुखाचे क्षण घालीत असतात मधुन साद मात्र आपण दयायचा नसतो प्रतिसाद. निरोपाच्या वेळी फक्त एकच करायचं असतं, दुस-याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं असतं.अशा भावपूर्ण व आनंदी वातावरणात निवृत्ती समारंभ सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेशदादा साबळे व दादा फरास यांनी केले. कार्यक्रमास अंकुश साळुंखे,किरण साळुंखे, उमेश सावंत, जालिंदर गोडसे, सुदाम शिंदे, सुनील भोसले, तसेच फिल्डवरील व कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.













