Mon, Mar 2, 2026
प्रशासन सातारा जिल्हा

पोलीस व महसूल विभागाने निवडणुकीसाठी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पोलीस व महसूल विभागाने निवडणुकीसाठी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
Ashok Ithape
  • PublishedOctober 17, 2023

सातारा, दि.17 (जिमाका):

निवडणुकीच्या काळात महसूल व पोलीस विभागाने समन्वयाने काम करावे तसेच या दोन्ही विभागांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पूर्व तयार आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात एकही संवदेशिल मतदान केंद्र नसल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, कोणत्याही मतदान केंद्रावर अनूचित प्रकार घडणार नाही, मतदारांना प्रभावीत करण्याचा प्रयत्न होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. सर्व मतदान केंद्रांचे वस्तुनिष्ठ माहिती घेऊन महसूल व पोलीस विभागाने त्यांचे सर्व्हेक्षण करावे. मतदान केंद्रांवर काही त्रुटी असल्यास सोयी सुविधांचा अभाव याबाबत माहिती घ्यावी. त्यानुसार अहवाल तयार करुन 25 ऑक्टोंबर पर्यंत सादर करावी.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान केंद्राची रचना असेल, असे पहावे. इंटरनेट, फोन कनेक्टीव्हिटीच्या दृष्टीने शॅडो झोनबाबतची माहितीही घेण्यात यावी म्हणजे त्या अनुषंगाने इंटरनेट सुविधेचे तजवीज करता येईल.

मतदार यादी आद्ययावत करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. तृतीय पंथी, दिव्यांग यांच्या नोंदणीसाठी प्रत्यक्ष भेटीतून त्यांचे अर्ज भरुन घ्यावे. या कामास प्राधान्य द्यावे. मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी सर्व सोयी उपलब्ध करुन द्याव्यात. मृत व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया गतीने करावी. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. 18 ते 19 वयोगटातील पात्र मतदारांच्या नोंदणीसाठी प्रयत्न करावेत.

सध्या जिल्ह्यात या वयोगटातील फक्त 26 हजार मतदारांची नोंद आहे. तर जिल्ह्यात 1 लाख 17 हजाराच्या आसपास या वयोगटातील मतदार आहेत. त्यांची नोंदणी प्राधान्याने करावी. गत निवडणुकीत ज्या ठिकाणी मतदान कमी झाले आहे त्या ठिकाणी जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावेत, विशेष मोहिमा राबवाव्यात, स्वीप कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवावा.
अवैध मद्य प्रकरणांमध्ये कडक कारवाई करावी. ही कारवाई आत्तापासूनच सुरु करुन निवडणूक काळात याबाबत जागृक राहून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी.

वाहनांची उपलब्धता तृतीय पंथी, देह विक्री करणाऱ्या व दिव्यांगांच्या नोंदणीस प्राधान्य, पूर्वीच्या निवडणुकांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांची निर्गती करण्यात यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी केल्या.

पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी पोलस विभागाने राबवावयाच्या कार्यपद्धती विषयी सूचना करुन महसूल विभागाशी नियमित संपर्कात राहून काम करावे, गुन्ह्यांच्या निर्गतीसाठी महसूल विभागाशी बैठक घ्यावी, अशा सूचना केल्या.यावेळी त्यांनी निवडणूक ही संपूर्ण देशाची असते त्यामुळे सर्व यंत्रणांचा यात समन्वयाने सहभाग अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!