Wed, Feb 25, 2026
शिक्षण

आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू १० मार्च पर्यंत करता येणार अर्ज

आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू १० मार्च पर्यंत करता येणार अर्ज
Ashok Ithape
  • PublishedFebruary 17, 2026

मुंबई, दि. १६: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमध्ये २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. बालकांच्या पालकांना यासाठी संबंधित अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही प्रक्रिया राबविण्याबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या असल्याची माहिती शालेय शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी दिली आहे.

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना
आरटीई अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. वंचित घटकांतील बालकांमध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), (क), (ड) इतर मागासवर्ग (ओबीसी), विशेष मागासवर्ग (एसबीसी), आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, एचआयव्ही बाधित किंवा प्रभावित बालक, अनाथ बालके, दिव्यांग बालके अथवा कोविड प्रभावित बालकांचा समावेश होतो. तर, आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. बालकांच्या पालकांना त्यांच्या निवासस्थाच्या ठिकाणापासून एक किमी पेक्षा कमी अंतरावरील शाळा (हवाई अंतर) आरटीई पोर्टलवर दिसतील. या अनुषंगाने प्रक्रियेकरिता विचारपूर्वक १० शाळांची निवड करण्यात यावी आदी सूचना शिक्षण संचालनालयामार्फत देण्यात आल्या आहेत.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडण्यात यावीत, अचूक माहिती भरण्यात यावी, तसेच विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी. प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्रांची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करुन समस्येचे निराकरण करता येईल, असेही शिक्षण संचालनालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!