भुईंज येथे रविवारी भव्य रथसप्तमी सोहळा
भुईंज : भुईंज येथील कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या प्राचीन ऋषी महर्षी भृगुरूषी महाराज यांच्या जीर्णोद्धारीत मठाच्या वर्धापनदिनानिमित्त भव्य-दिव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रथसप्तमी दिनी, रविवारी (दि. २५ जानेवारी) उत्साहात साजरा होणार आहे.
श्री क्षेत्र नारायणपूर येथील विश्वचैतन्य प. पूज्य सद्गुरू नारायण महाराज ऊर्फ आण्णा महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली सुमारे तीन तपांपूर्वी ग्रामस्थांच्या पुढाकारातून या मठाचा तसेच महर्षी भृगुरूषी महाराजांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्या स्मरणार्थ आणि वर्धापनदिनाचे औचित्य साधून दरवर्षी रथसप्तमीच्या दिवशी हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात येतो.
यंदाच्या वर्षी हा सोहळा नारायणपूर संस्थानचे उत्तराधिकारी सद्गुरू टेंबे स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत पार पडणार असून, विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या पवित्र सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन दत्त सेवेकरी मंडळ, आचार्य भृगुरूषी मठ सेवेकरी, देवस्थान ट्रस्ट तसेच तीर्थक्षेत्र भुईंज येथील युवकांनी केले आहे.













