क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा भव्यदिव्य करा – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा, दि. 30 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा दिमाखादार आणि भव्यदिव्य पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर काम करावे. या कार्यक्रमाच्या नियोजनात प्रशासनाने कोणतेही कसूर ठेवू नये. तसेच ग्रामस्थांनीही यामध्ये उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
नायगाव ता. खंडाळा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्याच्या तयारीचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी घेतला.यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, प्रांताधिकारी डॉ. यागेश खरमाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे, सरपंच स्वाती जमदाडे, उपसरपंच गणेश नेवसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्याच्या अनुषंगाने दोन्ही मंत्री महोदयांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला व प्रत्यक्ष स्थळ पहाणी केली. जयंती सोहळा अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात घेऊन तो उत्तम प्रकारे यशस्वी करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई यांनी प्रशासनाला अलर्ट मोडवर राहून काम करण्याच्या सूचना दिल्या.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जागतिक दर्जाचे स्मारक 10 एकरावर उभे राहत असून त्यासाठी सुरु असलेल्या भूसंपादन कामाचा आढावाही त्यांनी घेतला. या स्मारकाच्या आराखड्यामध्ये ग्रामस्थांनी सुचविलेली कामे अंर्तभूत करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.













