उल्हास दादा पवार यांनी गुंफले भुईंज येथील कृष्णाकाठी ज्ञानपुष्प
भुईंज : जेष्ठ नेते कै. प्रतापरावजी भोसले हे सर्व स्पर्शी व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या सहवासात माझ्या सारख्या कार्यकर्त्याची जडणघडण झाली यामुळेच आज मी स्वतःला भाग्यवान समजतो. अशी माणसं राज्याला नेतृत्व देणारी असल्याने त्यांच्या कर्तृत्वातून जीवन प्रवासातून आजहि नव्या पिढीला उर्जा मिळते, असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत व संत साहित्यिक उल्हासदादा पवार यांनी केले.
भुईंज ता. वाई याठिकाणी ज्ञानसत्र कृष्णा काठावरील या व्याख्यान मालेत दिवंगत जेष्ठ नेते प्रतापरावजी भोसले यांच्या जीवनपटावर आधारित विषयावर प्रमुख व्यक्ते म्हणून जेष्ठ विचारवंत व संत साहित्यिक उल्हासदादा पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ॲड. प्रताप देशमुख तर प्रमुख उपस्थिती माजी आमदार मदनदादा भोसले होते.
यावेळी बोलताना उल्हासदादा पवार पुढे म्हणाले की भुईंजचे सरपंच पद ते संसदेच्या सभागृहातील खासदार ते हि यशवंतराव चव्हाण साहेबांचे वारसदार म्हणून महाराष्ट्रत प्रतापराव भाऊंचे नाव आज हि आदाराने घेतले जाते. त्यांनी ग्रामीण विकास मंत्री असो किंवा विविध पदांवर केलेले कामाबाबत कधीही डांगोरा पिटला नाही. कधीहि कुटल्याहि नेत्याकडे काहीहि मागितले नाही, एवढ साध सरळ व्यक्तिमत्व म्हणजे आमच्यासाठी एक शिकण्याची कार्यशाळाच होती. त्यांनी आपल्या प्रत्येक कृतीतून दिलेला संदेश जपलेले व्रत समजने खूप अवघड आहे. आजही त्यांच्या विचाराने व कार्यकर्तृत्वाने नव्यापिढीला नवीन उर्जा मिळून सार्वजनिक जीवनातील स्वच्छ व्यक्तिमत्व काय ते समजेल असे सांगून त्यांनी भाऊंच्या अनेक आठवणी सांगितल्या.
तर अध्यक्ष पदावरून बोलताना ॲड प्रताप देशमुख यांनी प्रतापराव भोसले हे एक शेतकरी कुटुंबातील कष्टकरी तरूण ते यशवंतराव चव्हाण, देशभक्त आबासाहेब वीर यांच्या तालमीतील कसदार व्यक्तिमत्व कसे घडले याचे दाखले देत अनेक प्रसंगांना उजाळा दिला.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत ज्ञानेश्वरी पारायण मंडळ यांच्यावतीने माजी सरपंच अर्जुन भोसले यांनी केले. प्रास्ताविक रामदास जाधव यांनी केले तर आभार जगन्नाथ दगडे यांनी मानले. कार्यक्रमास भुईज आणि परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते
फोटो ओळी : ज्ञानसत्र कृष्णा काठावरील व्याख्यानमालेत उल्हासदादा पवार यांचा सत्कार करताना मदनदादा भोसले शेजारी ॲड. प्रताप देशमुख.













