Mon, Mar 2, 2026
अध्यात्म

भुईंज येथे दि. 28 जानेवारी पासून भव्य पारायण सोहळा

भुईंज येथे दि. 28 जानेवारी पासून भव्य पारायण सोहळा
Ashok Ithape
  • PublishedJanuary 24, 2025

नामवंत किर्तनकारांसोबत अनेक मान्यवरांची व्याख्याने

भुईंज : येथील ज्ञानेश्‍वरी पारायण मंडळाच्या वतीने यंदाचा 47 वा ग्रंथराज श्री ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा मंगळवार दि. 28 जानेवारी ते रविवार 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीत भृगुऋषी मठातील सद‍्गुरु श्री नारायण तथा आण्णा महाराज ज्ञानमंदिर सभागृहात संपन्न होत आहे, अशी माहिती या सोहळ्याचे कार्यवाह रामदासबापू जाधव यांनी दिली.

या सोहळ्यात निनाम पाडळी येथील संदीप महाराज गुरव, आळंदी येथील हभप ज्योतीताई मतकर, वेळापूर येथील प्रदीप महाराज ढेरे, पंढरपूर येथील हभप भागवत महाराज कबीर, पंढरपूर येथील हभप श्रीहरी महाराज नामदास यांचे दररोज रात्री 9 ते 11 या वेळेत किर्तन होणार आहे. तर रविवार दि. 2 फेब्रुवारी 2024 रोजी आळंदी येथील हभप माऊली महाराज शिंदे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तसेच भुईंज, पिराचीवाडी, ओझर्डे, आळंदी येथील भजनी मंडळाच्यावतीने जागर होणार आहे.

पारायण सोहळ्याच्या निमित्ताने दररोज दुपारी 3 वाजता होणार्‍या ज्ञानसत्र कृष्णाकाठचे या व्याख्यानमालेत मंगळवार दि. 28 रोजी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग साताराचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, बुधवार दि. 29 रोजी माजी आमदार उल्हासदादा पवार, राजेंद्र शेलार, बाबुराव शिंदे, गुरुवार दि. 30 रोजी हभप श्रीपाद जाधव, सातारा, शुक्रवार दि. 31 रोजी सद‍्गुरु टेंभे स्वामी महाराज, भरतनाना क्षीरसागर यांचे व्याख्यान होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने या व्याख्यानमालेतून परमपुज्य सद‍्गुरु नारायण तथा आण्णा महाराज, भुईंज गावचे सुपूत्र ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या स्मृतींना मान्यवर व्याख्याते उजाळा देणार आहेत.

याच सोहळ्यात गावातील विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणार्‍या युवक, युवती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांसाठी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय मान्यवर नेते देखील उपस्थित राहणार असून या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो खालील ओळी : भुईंज पारायण सोहळ्याचे पत्रिकेचे प्रकाशन करतांना सद्गुरू टेंबे स्वामीं,भरतनाना क्षीरसागर,रामदास जाधव,राहुल तांबोळी,जयवंत पिसाळ,जगन्नाथ दगडे,अभिजीत जाधव,कृष्णात घाडगे व इतर

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!