केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी इकॉनॉमिक टाइम्स न्यूट्रिवेल कॉन्क्लेव्ह 2024 मध्ये भारताच्या पोषण नवोपक्रम दृष्टीकोनावर टाकला प्रकाश
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2024
“सेंद्रिय अन्नाचे सेवन, पारंपरिक आहार संस्कृतीकडे परत वळणे आणि प्रिझर्व्हेटिव्हजचा किमान वापर ही सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली आहे” असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
इकॉनॉमिक टाइम्स न्यूट्रीवेल कॉन्क्लेव्ह 2024मध्ये केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी केलेल्या बीजभाषणाचा हा गाभा आहे.
पोषण क्षेत्रात नावीन्य आणि शाश्वतता वाढवण्यासाठी केंद्र सरकारची वचनबद्धता त्यांनी विशद केली.
भारताच्या पोषणविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांनी बहुआयामी दृष्टिकोनाची कल्पना मांडली.अत्याधुनिक संशोधन, सार्वजनिक-खाजगी भागीदारी तसेच दीर्घकालीन अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी त्यांनी शाश्वत पद्धतींवर भर दिला.
बाजारात आलेली पौष्टिक उत्पादने किती सुरक्षित आणि प्रभावी आहेत हे ठरवण्यासाठी एका सक्षम रचनात्मक चौकटीची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करताना आणि पौष्टिक उत्पादनांच्या बाजारपेठेतील विक्रीला चालना देण्यासाठी नवकल्पना प्रत्यक्षात आणणे एका संतुलित नियामक वातावरणामुळे सुकर होईल, असेही त्यांनी सांगितले.
कायमस्वरुपी, कोणत्याही हवामानात चालू शकतील अशा अन्न प्रक्रिया प्रणाली ज्या स्थानिक पातळीवर तयार झालेल्या सकस अन्नाचा वापर राष्ट्रीय पोषणाची परिणामकारता वाढवण्यासाठी साधन म्हणून करतील अशा प्रणालींना चालना दिली पाहिजे असे ते म्हणाले.
नवकल्पना, सहयोग आणि शाश्वततेद्वारे भारतातील पोषण क्रांतीला चालना देण्याच्या सरकारच्या संकल्पाचा जितेंद्र सिंह यांनी पुनरूच्चार केला. एकत्रित प्रयत्नांमुळे प्रत्येक भारतीयाला निरोगी आणि अधिक पोषक भविष्य मिळेल, असा विश्वास जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.













