‘ताल’ची 25 वर्षे: आठवणी आणि जादूई काळाची वाटणारी ओढ ’- 55 व्या इफ्फी मध्ये सुभाष घई यांच्या ‘ताल’चे विशेष प्रक्षेपण
“आजकाल मोठमोठ्या स्टुडिओच्या दबावामुळे निर्जीव सिनेमांची निर्मिती”- चित्रपट निर्माते सुभाष घई
आज, इफ्फी 2024 मध्ये ‘ताल’ चा 25 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण केल्यानंतर दिग्दर्शक सुभाष घई, गायिका कविता कृष्णमूर्ती आणि अभिनेता जीविधा शर्मा यांच्यासह ‘ताल’ च्या टीमने पत्रकार परिषदेत संवाद साधला.
‘ताल’चे दिग्दर्शक सुभाष घई यांनी आपल्या प्रारंभीच्या टिप्पणीमध्ये म्हणाले की, आजपर्यंत या चित्रपटाची प्रचंड लोकप्रियता लक्षात घेता, हा चित्रपट न पाहिलेला माणूस मिळणे दुर्मिळ आहे.
“काही चित्रपटांना दीर्घायुष्य असते आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. जेव्हा तुम्हाला वाईट वाटत असेल, तेव्हा तुम्हाला ताल सारखा चित्रपट पहावासा वाटेल”, असे चित्रपटाचा मुख्य अभिनेता अनिल कपूरने एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.
“सुभाष घई हे इंडस्ट्रीचे मास्टर शोमन आहेत ज्यांनी अनेक उत्कृष्ट रचना निर्माण केल्या. सुभाष घई यांना समजून घेण्यासाठी आणि मोठ्या पडद्याबद्दल घई यांची दृष्टी जाणून घेण्यासाठी, आपण सर्वांनी ताल पाहिला पाहिजे.” असे सौरभ शुक्ला यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे मनोगत व्यक्त केले. सौरभ शुक्ला यांनीही या चित्रपटात काम केले आहे.
‘ताल’ हा ‘व्हरायटीच्या टॉप 20 बॉक्स-ऑफिस’ सूचीत मोडणारा पहिला भारतीय चित्रपट होता. सुभाष घई यांनी ए.आर. रहमान यांना या चित्रपटासाठी संगीत देण्यास कसे पटवले ते सांगताना रहमानला म्हणाले, “मला हा संगीतमय चित्रपट बनवायचा आहे. म्हणजे तू माझ्या चित्रपटाचा हिरो आहेस आणि मी त्याचा दिग्दर्शक आहे”!
यावेळी सुभाष घई यांनी चित्रपटाविषयीच्या त्यांच्या दृष्टीकोनाविषयी अधिक अंतर्दृष्टी दिली आणि सांगितले की, या चित्रपटाशी संबंधित असलेल्या सात ‘सूर’ (संगीत स्वर) चे प्रतीक असलेल्या मुलीचे मुख्य पात्र चित्रपट संपेपर्यंत विकासाच्या सात टप्प्यांतून जाते.
या चित्रपटात अक्षय खन्नाचे विशुद्ध प्रेम आणि अनिल कपूर प्रस्तुत भौतिक जग यांच्यातील संघर्ष दाखवतो, असे घई पुढे म्हणाले.
“संगीत, रचना, अभिनय, वेशभूषा या सर्व गोष्टी या चित्रपटात एकमेकांशी सुसंगत होत्या कारण आजकाल चित्रपटांना वित्तपुरवठा करणाऱ्या कोणत्याही मोठ्या स्टुडिओचा माझ्यावर दबाव नव्हता किंवा मी बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीच्या मागे धावत नव्हतो. जेव्हा एखादा दिग्दर्शक चित्रपटाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल जास्त चिंतित असतो तेव्हा त्याला त्याच्या दिग्दर्शनाच्या कामावर नक्कीच लक्ष केंद्रित करणे अवघड जाते, ‘’ असे घई यांनी खेदाने सांगितले.
कविता कृष्णमूर्ती यांनी तो परिपूर्ण विशिष्ट स्वर लागेपर्यंत तासनतास गाणे गायले, अशी एक आठवण सुभाष घई यांनी सांगितली आणि चित्रपट बनत असताना कलाकारांच्या समर्पणाबद्दल तपशीलवार माहिती दिली.
“फक्त भारतीय श्रोत्यांनाच नाही तर मी जगभरातील श्रोत्यांना आकर्षित करता येऊ शकेल, अशा पद्धतीने गाण्याचा प्रयत्न केला,” असे प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी सांगून ‘ताल’ साठी गाण्यात आलेल्या सुपरहिट गाण्यांची आठवण करून दिली.
“मी चित्रपट क्षेत्रामध्ये नवीन होते आणि ‘ ताल’ ही इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट व्यक्तींकडून कलाकुसर शिकण्याची एक उत्तम संधी माझ्यासाठी होती.” असे या चित्रपटात इला (ऐश्वर्या रायने साकारलेल्या मुख्य अभिनेत्रीच्या बहिणींपैकी एक) ची भूमिका साकारणारी जीविधा शर्मा हिने सांगितले .













