Tue, Mar 3, 2026
राजकीय बातमीपत्र

सातारा – जावली मतदारसंघातील जनतेसाठी मी २४ तास उपलब्ध; श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा – जावली मतदारसंघातील जनतेसाठी मी २४ तास उपलब्ध; श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले
Ashok Ithape
  • PublishedOctober 27, 2024

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )

जावलीतील आजी- माजी सरपंच शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठीशी ठाम
सातारा- सातारा- जावली मतदारसंघात प्रत्येक गावातील विकासकामे मार्गी लावली आहेत. वाडी- वस्ती विकासाच्या प्रवाहात आणली. आज एखादे काम करायचे शिल्लक आहे, अशी बोटावर मोजण्याएवढी पण गावे नाहीत. गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार विकासकामे मार्गी लावली आहेत. मी कायम जनतेसोबत आहे. निवडणूक आली की काही जणांना कळवळा येतो पण, कोण कामं करतो हे जनतेला चांगलंच माहिती आहे. काहीही झाले तरी मी जनतेसाठी २४ तास उपलब्ध असतो आणि आहे. त्यामुळे विरोधकांना त्यांची जागा परखडपणे दाखवून द्या, असे आवाहन सातारा- जावली मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

करंजे ता. जावली येथे शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारार्थ जावली तालुक्यातील आजी- माजी सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा भव्य मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्यात जावली तालुक्यातील आजी- माजी सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना एकमुखी पाठिंबा दर्शवून शिवेंद्रसिंहराजेंच्या विजयात मोलाचा वाटा उचलण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, आरपीआयचे एकनाथ रोकडे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा- जावलीच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहिलो आहे. महायुतीचे सरकार असल्याने गेल्या काही वर्षात हजारो कोटींची विकासकामे झाली आहेत. आगामी काळातही महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे जावलीतील विकासपर्व कोणीही थांबवू शकत नाही. आपण सर्वानीच महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. काही लोक निवडणुकीपुरते उगवतात, मोठमोठ्या वलग्ना करतात. त्यांच्या हातून एका रुपयाचे तरी काम झाले आहे का? याचा विचार समस्त जावलीकरांनी करावा आणि महायुतीलाच मतदान करावे, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

अजित मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम खुडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला समाधान पोफळे, विजय सपकाळ, सचिन दळवी, कुंडलिक पार्टे, अमोल आंग्रे, बजरंग चौधरी, संतोष केंजळे, संजय शेलाटकर, बापू कांबळे, संतोष महामूलकर, साहेबराव पवार यांच्यासह १५३ पैकी १५० गावचे आजी- माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!