डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सेंद्रिय शेती करावी : विकास बंडगर
सातारा l प्रतिनिधी:
कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत निवड केलेल्या गटप्रमुख, कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 17ते 18 मार्च 2024 दरम्यान कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथे पार पडला.
या प्रशिक्षण कार्यक्रमास वाई तालुक्यातील नैसर्गिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी, गटप्रमुख ,संबंधित कृषी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या वेळी उद्यान विद्या शास्त्रज्ञ श्री भूषण यादगीरवार यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेती म्हणजे काय व सोबत शेतीमध्ये कीड व रोग संरक्षणासाठी आणि जिवाणूंची संख्या वाढविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे ,याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना जीवामृत, बिजामृत ,घन जीवामृत दशपर्णी अर्क ,निमाश्र, ब्रह्मास्त्र ,सूक्ष्म अन्नद्रव्य , दहा ड्रम थेअरी साठी लागणाऱ्या निविष्ठा कशा तयार करायच्या त्याचा वापर कसा करायचा याविषयी मार्गदर्शन केले.अजिंक्य घाडगे यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेबाबत माहिती दिली.
दुसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये सागर सकटे यांनी अझोला निर्मिती व त्याचे फायदे या विषयावर माहिती दिली. कृषीभूष शेतकरी अशोक चिवटे यांनी नैसर्गिक शेती व पाचट व्यवस्थापन या विषयावर माहिती दिली. अमोल भोसले यांनी गांडूळ खत निर्मिती आणि त्याचे महत्त्व या विषयावर मनोगत व्यक्त केले. सेंद्रिय शेती अभ्यासक दादासो घाडगे यांनी ब्रम्हास्त्र व अग्निअस्त्र तयार करण्याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले. तद्नंतर त्यांनी जीवामृत तयार करण्याची पद्धत याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रदीप देवरे यांनी माती परीक्षण व गट बांधणी या विषयी माहिती दिली. या प्रशिक्षण दरम्यान नैसर्गिक पद्धतीने आपला शेतीमाल कसा पिकवायचा या गोष्टीवर भर देताना यासाठी शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेणे फार महत्त्वाचे आहे असे मत कार्यक्रम समन्वयक डॉ महेश बाबर यांनी व्यक्त केलं .
सुजित जगताप व शेतकरी भोसले यांनी मनोगत व्यक्त केलं.प्रशिक्षणच्या समारोपाच्या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे प्रकल्प संचालक आत्मा सातारा चे विकास बंडगर उपस्थित होते. त्यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हणाले कि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट तयार करावे व सेंद्रिय प्रमाणीकरण प्रक्रियेत भाग घ्यावा जेणेकरून उत्पादित शेतमाल व प्रक्रिया युक्त पदार्थ विक्रीतून योग्य मोबदला मिळू शकते.सेंद्रिय खतांचा वापर करावा व सेंद्रिय निविष्ठा बांधवरच तयार करावा असे नमूद केले. आभार योगेश जयकर यांनी व्यक्त केलं.













