Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मतदारसंघासाठी निधी कमी पडू देणार नाही सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मतदारसंघासाठी निधी कमी पडू देणार नाही सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण
Ashok Ithape
  • PublishedFebruary 8, 2024

भुईंज। महेंद्र (आबा) जाधव

महाराष्ट्रात रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भरीव निधी दिला जात आहे. सातारा जिल्ह्यालाही विकासकामांसाठी झुकते माप दिले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सुचवलेल्या विविध रोप वेच्या कामांसाठीही लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी दिला.

आसनगाव रस्ता प्रजीमा ३१ या रस्त्यावर सोनगाव- शेळकेवाडी दरम्यान उरमोडी नदीवर आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि नाबार्डच्या निधीतून मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या पुलाच्या उदघाटनप्रसंगी ना. रविंद्र चव्हाण बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, कराड उत्तर मतदारसंघाचे मनोज घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, सौ. कांचन साळुंखे, सुरेश सावंत, लालासाहेब पवार, अरविंद चव्हाण, सौरभ शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचल्या आहेत. सर्व सरकारी योजनांचा लाभ थेट जनतेला मिळत आहे. राज्य सरकारच्या ट्रिपल इंजिनमुळे विकासाला गती मिळाली आहे. परळी- सज्जनगड, उरमोडी धरण भिंत ते कास पठार, किल्ले अजिंक्यतारा आणि ठोसेघर धबधबा येथे रोप वे करण्याची मागणी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केली आहे. हि सर्व कामे मार्गी लावण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले.

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा- जावली मतदारसंघात असा एकही रस्ता उरलेला नाही ज्याचे काम सुचवावे. प्रत्येक ठिकाणी डांबरी रस्ता पोहचला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट झाला आहे. आमचा मतदारसंघ पूर्णपणे भाजपच्या पाठीशी असून येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणू, असे ते म्हणाले.

कार्यक्रमास रामकृष्ण वेताळ, आनंदराव कणसे, अरुण कापसे, संतोष कदम, संतोष शेळके, पपू देशपांडे, श्रीधर कंग्राळकर, सोनगाव, शेळकेवाडी भागातील विविध गावाचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, खैरमोडे, आंबेकर आदी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!