सामाजिक सेवारत्न पुरस्काराने ‘दिनबंधू’चा सन्मान
भुईंज : महेंद्रआबा जाधव :
सामाजिक, शैक्षणिक, कृषि क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन येथील दीन बंधू मित्र मंडळास मुंबई येथे राज्यस्तरीय आदर्श शैक्षणिक सामाजिक मंडळ सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने ज्येष्ठ कवी, व्याख्याते रमेश आव्हाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला हा सन्मान मंडळाचे अध्यक्ष सुनिल शेवते यांनी स्वीकारला. यावेळी मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे, शिक्षणतज्ञ हेमा मकवाना, मीनाक्षी गवळी, प्रकाश सावंत यांची प्रमुख उस्थितीती होती.
दीन बंधू मित्र मंडळाने गेली ५० वर्षांहून अधिक काळ सातत्याने विविध सामाजिक उपक्रमांद्वारे दिलेले योगदान महत्वाचे असून ग्रामीण भागात एखादी संस्था सलग एवढी वर्ष कार्यरत राहते हीच मोठी आश्चर्याची बाब आहे. ती कौतुकाची असून त्यामुळेच ही संस्था सन्मानास पात्र ठरते असे गौरवोद्गार रमेश आव्हाड यांनी काढून अध्यक्ष सुनिल शेवते यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेच्या सुरू असलेल्या वाटचालीचा आपल्या भाषणात गौरव केला.
सुनिल शेवते यांनी हा सन्मान मंडळाच्या सर्व ज्येष्ठ संस्थापक सदस्यांना अर्पण करून या सन्मानाचे सर्व श्रेय मंडळाच्या प्रत्येक सदस्याचे आहे, त्यांच्या सहकार्याच्या बळावरच दीन बंधू मित्र मंडळ एवढी वर्ष खंबीरपणे वाटचाल करत असल्याचे सांगितले.
यावेळी ग्रा. पं. सदस्य अमित लोखंडे, विनोद अडसूळ, पोपट शेवते, विनोद बनकर , योगेश दगडे , विक्रम शेवते आदी उपस्थित होते.
या सन्मानाबद्दल दीन बंधू मित्र मंडळ व अध्यक्ष सुनिल शेवते यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.













