Tue, Mar 3, 2026
शिक्षण

राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात वैज्ञानिक डॉ. अरविंद नातू यांचे व्याख्यान संपन्न

राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात वैज्ञानिक डॉ. अरविंद नातू यांचे व्याख्यान संपन्न
Ashok Ithape
  • PublishedDecember 28, 2023

पुणे, दि. २७: शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात आयसर येथील वैज्ञानिक डॉ. अरविंद नातू यांचे ‘निसर्ग आणि विज्ञान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

डॉ. नातू म्हणाले, नागरिकांनी चिकित्सकवृत्तीने निसर्गाचे निरीक्षण करुन त्यामधून सतत अध्ययन करीत राहावे. स्वतः ला का? कधी? कसे? असे प्रश्न विचारत राहावे असे म्हणून त्यांनी मानवी अस्तित्वासाठी तंत्रज्ञान विकसित करावे.

निर्सगाच्या निरीक्षणातूनच ‘वेलप्रो’चा शोध लागला. तसेच बुलेट ट्रेनचे इंजिन निर्माण करताना ‘किंगफिशर’ या पक्षाच एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना आवाज न करण्याच्या पद्धतीचा उपयोग झाला. रोबो निर्माण करताना झुरळासारख्या छोट्या किटकाने संकटाच्यावेळी स्वत:ची लांबी ५० टक्क्यापर्यंत करणे या संकल्पनेचा उपयोग करण्यात आला आहे. निरीक्षणाद्वारे अशा वैज्ञानिक गोष्टींचे आकलन होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे उपस्थित होते. प्रदर्शनात विविध राज्यातील प्राध्यापकांनी विज्ञान प्रदर्शनाबाबत सुरु असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. यामध्ये हिमाचल प्रदेश येथील डॉ. हेमंत कुमार, चंदीगडचे मनू शर्मा, नागालँडचे श्रीमती विसेतोनुओ अंगमी, मणिपूरचे ओनिनाम सिंग, आसामचे नितुल दास, बिहारचे कृष्णा कुमार, झारखंडच्या प्रिती मिश्रा, अंदमान- निकोबारचे राजेश कुमार, लडाखचे युसूफ अली आदींनी सहभाग घेतला.

५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी प्रदर्शनाला २ हजार ७०० विद्यार्थी आणि १४० शिक्षकांनी प्रदर्शनास भेट दिली. यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक श्री. येडगे यांनी प्रदर्शनात मांडलेल्या अविष्काराबद्दल माहिती घेतली तसेच कराड येथील यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

हे प्रदर्शन ३० डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे. अधिकाधिक नागरिक, शिक्षक, विद्यार्थी व विज्ञानप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. येडगे यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!