महाराष्ट्र वाल्मिकी ग. दि. माडगूळकर ! 46व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!
![]()
| तो राजहंस एक |
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ,मराठी माणसाचे लाडके अण्णा उर्फ ग दि माडगूकर ! मराठी मातीला पडलेले सुंदर स्वप्न! साहित्य सृष्टीतील प्रतिभावंत लेखक,चित्रपट सृष्टीतील झळाळते दिव्य रत्न ! शाहिरी,लावणी,अभंग,भक्तीगीत,,भावगीत ,देश भक्तीपर गीत, चित्रपट गीत,बालगीत,गीत रामायण अशा विविध प्रकारच्या कविता,गीतांच्या सागरात स्वच्छंद विहरणारा राजहंस, महाकवी,गीतकार! तसेच कथा कादंबरी,ललित साहित्य, पटकथा लेखक म्हणुन साहित्य व चित्रपट क्षेत्रात अजोड कार्य केलेले मराठमोळं व्यक्तीमत्व! या सर्वच कलादालनाला त्यांच्या अलौकिक प्रतिभेचा परिसस्पर्श लाभला.
त्यातुन चिरंतन,अभिजात,संस्कारी अशा कलाकृती निर्माण झाल्या.मराठी माणसाचे ते सांस्कृतिक संचित,अमूल्य अक्षरधन म्हणुन गणले जाते.सर्व सामान्य मराठी माणसाचे आदर्श,संस्कारी असे अक्षर धनच आहे.या महाराष्ट्र वाल्मीकीच्या दिव्य लेखनीतुन उदयास आलेले गीत रामायण न ऐकलेला, न आवडणारा मराठी माणूस सापडणे अवघडच आहे. रसिकांच्या हृदयावर कोरले गेलेले ते शब्द आहेत.भावमधुर,अर्थपूर्ण,व्यावहारिक दैनंदिन जीवनातील व सहजसोप्या शब्द शैलीतील अवीट गोडीची,हृदयाला भिडणारी,सहजगत्या ओठावर येणारी अशी अनेकाविध सुमधुर गाणी या महाकवीने रसिकांवर मुक्तहस्ते उधळली आहेत.
पेडगावचे शहाणे,उन पाउस,जगाच्या पाठीवर,हा माझा मार्ग एकला, लाखाची गोष्ट गोष्ट,दो आंखे बारह हात,गुंज उठी शहनाई,तुफान और दिया आदी गाजलेल्या हिंदी,मराठी चित्रपटांच्या कथा,पटकथा अण्णा माडगुळकरांच्या मंतरलेल्या, जादुई लेखणीतून साकारल्या गेल्या आहेत.या महान कलावंतांला श्रद्धांजली वाहताना खालील ओळी संयुक्तिक ठरतील .
” एकवार घे जन्म फिरुनी
ती मंतरलेली लेखणी घेउनी !
रसिकां दे दान भरभरुनी
तव” गीत सोनियांच्या खाणीतुनी !
हीच शब्दफुलांची विनम्र श्रद्धांजली
” गदिमा” आपल्या पावन चरणी !
विजय रघुनाथ भदाणे, नाशिक













