वाई पालिकेच्यावतीने कृत्रिम तळ्यात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन
![]()
पाणीपुरवठा योजनेच्या परिसरात पाच हजार मूर्तींचे विसर्जन एकाच हौदात होणार, वाई शहरातील गणेश भक्तांनी मूर्ती दान प्रक्रियेला सहकार्य करून नदीचे पावित्र्य जपावे
वाई, दि. वाई नगरपरिषदेच्यावतीने दान केलेल्या गणेशमुर्ती विसर्जन करण्यासाठी वाई नगरपालिकेच्या पाणीपुरवठा परिसरात कृत्रीम तलावाची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये जवळ –पास पाच हजार गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येवू शकते. वाई शहरातील गणेश भक्तांनी मुर्तींचे विसर्जन कृत्रिम तळ्यातच करावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले. यावेळी स्थापत्य अभियंता सचिन धेंडे, सहाय्यक अभियंता निनाद जगताप, कार्यालयीन निरीक्षक नारायण गोसावी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालीकेच्या वतीने कृष्णा नदी प्रदूषण रोखले जावे या हेतूने नागरिकांना नदी पात्रात मुर्ती विसर्जन करण्यास मज्जाव करण्यात येत आहे, तसेच गणेश मुर्ती पालिकेस दान करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार प्रत्येक वॉर्डमध्ये एक गणेश रथ बनविण्यात येवून त्यातून गणेशमुर्तीचे संकलन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्यावतीने स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात आली आहे. तर वाहतूक व विसर्जन करण्यासाठी स्वतंत्र टिम तयार करण्यात आली आहे. यामुळे वेळेत श्रींचे विसर्जन करण्यावर प्रशासन भर देणार आहे. बुधवार दि. २० रोजी दीड दिवसाच्या गणपतीचे अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
पालिकेच्या वतीने दहा हजार लिटर पाणी बसेल एवढ्या मोठ्या कृत्रिम तळ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये पाच हजार मूर्तींचे विसर्जन होणार असून मूर्ती स्वीकारण्यासाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात येणार आहे.
पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत दरवर्षी वाईकर नागरिक पालिकेकडे मूर्तींचे दान प्रक्रियेला चांगला प्रतिसाद देतात, ज्या मुर्ती कृत्रिम तलावामध्ये विधिवत पुजा करून पारंपारीक पध्दतीने विसर्जन करण्यात येते, पाचव्या दिवशी गौरी विसर्जन बरोबर गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांनी कृष्णा नदीवर गर्दी करू नये, गणेश भक्त गणपतीची विधिवत पूजा करून पालिकेच्या रथात मूर्ती दान प्रक्रियेत सहभागी होतात, तर काही जण पालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद न देता कृष्णा नदीच्या पाण्यात विसर्जित करतात.
वाई कर नागरिकांनी पाचवा, सातवा, नऊ दिवसांच्या गणेश विसर्जना दिवशी व अनंतचतुर्थीला जास्तीत जास्त गणपतींचे घरगुती विसर्जन करावे अथवा पालिकेच्या गणेश रथात दान द्यावेत. नदीवर विसर्जनासाठी जावू नये. कृष्णा नदीचे पावित्र्य जपावे, सध्या कृष्णा नदीत पावसाने ओढ दिल्याने पाणी नसून आपल्या मूर्तींचे योग्य पद्धतीने विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी केले आहे.













