अजित पवार गटात जाण्याबाबत जयंत पाटील यांच्याविषयीच संभ्रम का निर्माण झाला?
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधल्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे अजित पवार यांची साथ देऊन सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा काही दिवस सुरू आहे. 5 ऑगस्टला जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचंही बोललं जात होतं.
पण जयंत पाटील यांनी या भेटीचं खंडन केलं. ते म्हणाले, “माझ्याविषयी गैरसमज पसरवू नका. मी शाहांना भेटलो याचे काही पुरावे आहेत का? मी संध्याकाळी आणि आज सकाळी पवारसाहेबांसोबत होतो. रात्री दीड वाजेपर्यंत अनिल देशमुख, राजेश टोपेंसोबत बैठकीत होतो.”
हे स्पष्टीकरण दिल्यानंतर मी शेवटपर्यंत शरद पवारांसोबत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शरद पवार गटातील इतक्या नेत्यांऐवजी जयंत पाटील यांच्याबाबत हा संभ्रम का निर्माण झाला? त्याची काय कारणं आहेत?
आम्हालाच संभ्रम ठेवायचा आहे तर तुम्हाला काय अडचण?
अजित पवार गट सत्तेत सामील झाला. तेव्हा त्यांच्या गटातील आमदारांनी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका केली.
त्याचबरोबर अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांना काढून सुनील तटकरे यांची नियुक्ती केली. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याबाबतचं पत्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं.
दोन -तीन दिवस या घडामोडी घडत असताना आठवडाभरावर आलेल्या अधिवेशनात अजित पवार विरूध्द शरद पवार गट असं चित्र बघायला मिळेल असं वाटत असताना राष्ट्रवादीचे आमदार बराच काळ अधिवेशनात अनुपस्थित राहिले.

यातून संभ्रम वाढत गेला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते म्हणून उपस्थित राहणं अपेक्षित होतं, पण राष्ट्रवादीचा एकही प्रतिनिधी विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नसल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भूमिकेवर शंका घेतली जाऊ लागली.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तुमच्याकडे आमदारांची संख्या किती आहे हे स्पष्ट नाही त्यामुळे संभ्रम निर्माण होत असल्याचा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “आम्हालाच संभ्रम निर्माण करायचा असेल तर तुम्हाला काय अडचण आहे?” यावरून वाटाघाटी सुरू असल्याची शंका निर्माण होते.
वरिष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी सांगतात, “जयंत पाटील यांनी त्यांच्या वागण्यातून आणि बोलण्यातून हा संभ्रम निर्माण केला आहे. पाटील यांनी कितीही नाकारलं तरी खात्रीलायक माहितीनुसार, त्यांना अजित पवार गटाची ऑफर देण्यात आली आहे. त्यांच्यामध्ये वाटाघाटी सुरू असाव्यात.”
“जयंत पाटील हे शरद पवार गटातील अनेकांशी बोलताना पुढे कसा निभाव लागणार याबाबत नकारात्मक बोलत असल्याचंही नेते खासगीत सांगतात. त्यांची अधिवेशन काळातील देहबोली अजित पवार गटाकडे झुकणारी होती.”
पण अजित पवारांना जयंत पाटील यांच्या येण्याचा काय फायदा असू शकतो? याबाबत पुढे सुधीर सुर्यवंशी सांगतात, “जर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते जयंत पाटील अजित पवार गटात सामिल झाले तर पुढच्या तांत्रिक गोष्टी अजित पवार गटाला सोप्या होतील. त्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांचं जरी जमत नसलं तरी त्या दोघांनी राजकीयदृष्ट्या एकमेकांची गरज आहे. “













